राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू
By Admin | Updated: July 30, 2014 23:18 IST2014-07-30T23:10:05+5:302014-07-30T23:18:19+5:30
परळी आढावा बैठक : गाड्यांच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा एसटीच्या अधिकाऱ्यांना इशारा

राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू
परळी : एसटी बसेस वेळेवर येत नाहीत यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचून येथील प्रभाग आढावा बैठकीत परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. एसटीच्या गाड्या रद्द होणे, वेळेवर न येणे, गाड्या गळक्या असणे, अशा अनेक कारणांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकण्याचा इशारा एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि लवकरात लवकर कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
प्रभाग आढावा बैठकीला पंचायत समितीचे सभापती धर्मराज घोरपडे, उपसभापती विजय काळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सदस्या कविता चव्हाण, सदस्य सोमनाथ पवार, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, परळीचे सरपंच सतीश बोबडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठक सुरू होताच ग्रामस्थांनी एसटी महामंडळ, वीजवितरण कंपनी, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, उरमोडी धरण विभाग, पाटबंधारे विभाग यांच्याविषयीच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरुवात केली. एसटी महामंडळाने प्रत्येक बैठकीप्रमाणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ‘प्रस्तवा पाठविले आहेत, नवीन गाड्या वाढविल्या आहेत,’ अशी उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले. गाड्या वेळेवर येत नाहीत. अचानक रद्दसुद्धा होतात, असे सांगत ‘आम्ही राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू,’ असा इशारा ग्रामस्थांनी एसटी महांडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘लोक बसस्थानकातून मला फोन करतात. गाड्या अचानक रद्द का होतात? राजवाडा बसस्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी?’
कृषी विभागानेही आपल्या योजना राबविताना कृषी सहायकाकडून नव्हे तर गावचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन योजनेचा निधी खर्च करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
बुडित क्षेत्रात गेलेल्या दहिवड, बनघर, लुमणेखोल, वेणेखोल, पुनवडी, आरगडवाडी, रोहोट, नित्रळ, कातवडी या गावांना आरोग्य सुविधा द्याव्यात, पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, या ग्रामस्थांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नयेत, आरोग्य उपकेंद्रामध्ये दररोज तीन ते पाच या वेळेत आरोग्यसेवक व सेविकांनी उपस्थित राहावे, वन अधिकाऱ्यांनी गावांना, शाळांना, ग्रामपंचायतींना मोफत रोपे वाटावीत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरे दवाखान्यात येण्याची वाट न पाहता गावोगावी जाऊन लसीकरण करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (वार्ताहर)