‘ट्यूब’ पेटली दहा लाखांची...!
By Admin | Updated: February 28, 2016 00:36 IST2016-02-28T00:36:28+5:302016-02-28T00:36:28+5:30
गुरुकूल स्कूलचा उपक्रम : चौदाशे विद्यार्थ्यांनी आपापल्या घरात केली तब्बल दीड लाख युनिटस् विजेची बचत

‘ट्यूब’ पेटली दहा लाखांची...!
प्रदीप यादव सातारा
पोरांना काय कळतंय? हा तमाम लोकांचा अन् पालकांचाही आवडता शेरा! पण येथील गुरुकुल स्कूलच्या पोरांनी जी किमया करून दाखवलीय, ते बघून त्यांच्यावर कुणीच अशी शेरेबाजी करणार नाही. अहो... या हुश्शार पोरांनी शे-दोनशे नव्हे तर तब्बल दीड लाख युनिट वीज वाचवून दहा लाख रुपयांची बचत केलीय.
शाहूनगर भागात गुरुकुल स्कूल आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांना सहा वर्षांपूर्वी ही भन्नाट कल्पना सुचली. याबाबत चोरगे म्हणाले, ‘शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सर्व मुलांना एकत्र बोलावून वीजबचत करण्याबाबत सांगितले. आपण वीज आणि पाणी तयार करू शकत नाही, त्यामुळे दोन्ही गोष्टी वाट्टेल तशा वापरण्याचा आपल्या अधिकार नाही, याची जाणीव मुलांना करून दिली. पाच वर्षांत संस्थेच्या चौदाशे विद्यार्थ्यांनी मिळून सुमारे दीड लाख युनिट वीज वाचविली आहे.’
या अभिनव उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका लीना जाधव म्हणाल्या, ‘शाळेतील चौदाशे मुलांनी प्रत्येकी रोज एक युनिट वीज जरी वाचविली तरी रोज चौदाशे युनिट वाचतील. म्हणजे वर्षाचे पाच लाख युनिट वाचतात. रुपयांत त्याची किंमत ३० लाख रुपये होते. हा विचार करून आम्ही काही वीजबचतीच्या टीप्स तयार केल्या आणि त्याचा तक्ता तयार करून मुलांना दिला. वर्षभरात प्रत्येक महिन्याला येणारे वीजबिल आणि मीटर रिडिंग लिहायचे, असे सांगितले. त्यानुसार मुलं कामाला लागली आणि आपल्या पालकांनाही हे करण्यास सांगितलं. याचा परिपाक म्हणजे पहिल्या वर्षी सर्व मुलांनी मिळून तब्बल ५० हजार युनिट वीज वाचविली.’
‘सुरुवातीला पालकांची मानसिकता बदलायला वेळ लागला; पण वीजबिलाच्या रकमेचा आकडा प्रत्येक महिन्याला कमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि तेही सतर्क झाले. छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या क्लृप्त्या मुलांना सांगितल्या,’ असे मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ यांनी सांगितले.
‘शाळेच्या वतीने सर्वाधिक वीजबचत करणाऱ्या मुलांना बक्षीस आणि पालकांचाही सत्कार करतो, त्यामुळे आता पालक स्वत:हून वीजबिले जपून ठेवत आहेत,’ अशी माहिती संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदेयांनी दिली.
विद्यार्थी वाचवू शकतात वर्षाला १,८१४ कोटींची वीज
राज्यभरातील ९२ हजार शाळा, महाविद्यालयांमध्ये सुमारे दीड कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना या अभियानात सहभागी करून ‘वीजबचत हीच वीजनिर्मिती’ हे अभियान चालविले तर दीड कोटी कुटुंब या अभियानाला जोडली जातील. या कुटुंबांनी रोज एक युनिट वीज वाचविली तरी रोज दीड कोटी आणि वर्षांला ५४० कोटी युनिट वीज वाचणार आहे. रुपयांमध्ये सांगायचे झाले तर या माध्यमातून आपण शासनाचे सुमारे १,८१४ कोटी ४० लाख रुपये वाचवू शकतो.
वीजबचतीसाठी मुलं अन् पालक हे करतात...
ज्या खोलीत आहे, त्याच खोलीचा दिवा चालू
साध्या बल्बपेक्षा सीएफ्एल किंसा एलईडीचा वापर
पंखा, एसी, फ्रिज आदींचा गरजेपुरताच वापर
फ्रिजचे दार उघडे न ठेवता बंद ठेवेण
घराबाहेर पडताना पंखा, दिवे बंद करणे
फोन चार्जरचे बटन उगाचच चालू न ठेवणे
गडद रंगाचे पडदे न लावणे
प्रकाश परावर्तीत होणारा रंग भिंतींना लावणे
शोभीवंत उपकरणांचा वापर टाळला
स्वनियंत्रित इस्त्रीचा वापर
वॉशिंग मशिनच्या टाईमरचा उपयोग
गिझरऐवजी सोलर उपकरणांचा वापर