गरीब रथने प्रवास म्हणजे आजही सुरक्षेची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:30+5:302021-02-05T09:12:30+5:30
सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची ...

गरीब रथने प्रवास म्हणजे आजही सुरक्षेची हमी
सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची एस.टी.बस त्या-त्या ठिकाणी पोहोचली आहे. अनेक भागात वाहन चालवताना चालकाची थोडी नजर चुकली तरी अपघात झालाच म्हणून समजा. तरीही जिल्ह्यात अपघाताच्या केवळ ३३ घटना घडल्या. त्यामुळे एस.टी.ने प्रवास म्हणजे सुरक्षा हे पुन्हा अधोरेखित झाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील शेकडो गाड्या राज्यभरात धावत असतात. यामधून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. रस्त्यावर वाहन चालविणे म्हटल्यावर घात-अपघात आलेच. कधी चालकाच्या चुकांमुळे, कधी तांत्रिक बिघाडामुळे, तर काही वेळेस समोरील वाहन येऊन धडकल्यामुळे अपघात होत असतात. तरीही अपघात घडूच नयेत म्हणून एस.टी. महामंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात. विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांचा गौरव केला जातो. त्यांच्यासाठी खास बिल्ला दिला जातो. तो बिल्ला छातीवर लावून फिरणे अभिमानास्पद मानले जाते.
सातारा जिल्ह्यातील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे अपघात घडतच असतात. सातारा विभागात गेल्या वर्षभरात अपघातांच्या ३३ घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ अपघात किरकोळ, तर १३ अपघात गंभीर स्वरुपाचे झाले आहेत. यात नऊजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे. यामध्ये आठ अपघात झाले आहेत. एस.टी.च्या चुकीमुळे अपघात होऊन कोणी जखमी झाल्यास तातडीने उपचारासाठी मदत दिली जाते. तसेच मृतांच्या नातेवाइकांनाही मदत केली जाते.
चौकट
जिल्ह्यातील एसटी चालक : १५८६
विनाअपघात एसटी चालविली म्हणून सत्कार
दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २८
पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २५
मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात
सातारा ८
कऱ्हाड ५
महाबळेश्वर ५
कोरेगाव - २
फलटण - ३
वाई - ३
पाटण -
दहिवडी - १
मेढा - २
खंडाळा - ३
वडूज - १
सत्तरला स्पीड लॉक
उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने महामार्गावर सरासरी वेग मर्यादा ऐंशी केली आहे. तरी सातारा विभागातील अनेक गाड्या सत्तरच्या आसपासच लॉक केल्या आहेत. त्यामुळे चालकाने कितीही एसटी पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. सातारा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी होण्यामागील हेही एक कारण मानले जाते.
चालकांचे कौतुक
राज्य परिवहन महामंडळाचे चालक नेहमीच आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. पाठीमागे चाळीस माणसं बसलेली आहेत, याचे भान ठेवून वाहन चालवितात. त्यामुळे अपघात कमी होतात. विनाअपघात सेवा बजावलेल्यांचे नेहमीच कौतुक केले जाते.
- सागर पळसुले,
विभाग नियंत्रक, सातारा.
कोट :
रस्त्यावरील अवस्था, पादचाऱ्यांचा विचार करावा लागतो. त्यांना एसटीपासून त्रास होऊ नये. समोरुन येणारे वाहन कसे येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने लक्ष ठेवावे लागते. घाई करून चालत नाही.
- नीलेश मेश्राम
चालक, मेढा आगार.
आयकार्ड फोटो