वाहतूक अस्ताव्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:27+5:302021-06-04T04:29:27+5:30
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा ...

वाहतूक अस्ताव्यस्त
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असतो. या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. आता लॉकडाऊन असल्याने या काळातच उपाययोजना करण्याची गरज आहे.
०००००००००
मास्कचा विसर
सातारा : शासकीय तसेच खासगी कामासाठी असंख्य लोकांना साताऱ्यात यावे लागते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. मात्र तरीही अनेकांना मास्कचा वापर करण्याचा विसर पडत आहे.
००००००
तरुणांची बेपर्वाई
सातारा : साताऱ्यातील अनेक तरुण रात्री मित्रांसोबत एकत्र येतात. तेथे गप्पा मारताना कोणाच्याही गाड्यांच्या हॅण्डलवर मास्क काही वेळासाठी काढून ठेवतात अन् तसाच विसरून जातात. हा प्रकार त्यांच्यासोबतच इतरांसाठी धोक्याचा ठरतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची गरज आहे.
०००००
रस्ता टकाटक
सातारा : साताऱ्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खराब झाल्याच्या, खड्डे पडल्याच्या तक्रारी येत असतात. मात्र सातारा-धावडशी रस्ता अतिशय टकाटक आहे. धावडशीहून काही मिनिटांत नागरिक साताऱ्यात येत आहेत. या रस्त्याची निगा राखण्याची मागणी केली जात आहे.
०००
दारावर भाजीविक्री
सातारा : कोरोनानंतर संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करुन सातारकरांना दारावर भाजी, फळे मिळतील असे नियोजन केले होते. त्यानंतर काही विक्रेत्यांना दारावर जाऊन भाजीविक्री करण्याची सवय लागली आहे, ती कायमच आहे. ते आजही दररोज वेगवेगळ्या भागांत जाऊन फळे, भाजी हातगाडीवरून नेऊन विक्री करत असतात. त्यामुळे सातारकरांची चांगली सोयही होत आहे.
००००००००००००
वाळूउपसा सुरूच
सातारा : जिल्ह्यात वाळूचा उपसा करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही ग्रामीण भागात चोरून वाळूउपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. ही वाहतूक रात्रीच्या वेळी केली जात असल्याने संबंधित विभागाने सापळा रचून कारवाई करणे गरजेचे आहे.
०००००
सांडपाणी रस्त्यावर
सातारा : सातारा शहरात अनेक भागांत सांडपाण्यासाठी भुयारी गटार योजना राबविलेली आहे. मात्र उर्वरित भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधी सुटत असते. त्यामुळे पालिकेने संबंधित गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
००००००००
प्रवासास विलंब
सातारा : सातारा-फलटण मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासाला विलंब होत आहे. सातारा ते फलटण या एक ते सव्वा तासाच्या अंतरासाठी दीड-पावणे दोन तास लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
००००
दवाखान्यात गर्दी
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा लागत होत्या. कोरोनाचा धोका कायम असल्याने रुग्णांची अगोदर नाव नोंदणी करुन वेळ निश्चित सांगितली जात होती.
००००
पंक्चरच्या प्रमाणात वाढ
सातारा : साताऱ्यात अनेक ठिकाणची खडी उचकटत आहे. त्याचा दुचाकी वाहनांना फटका बसायला लागला आहे. गाड्यांच्या जुन्या पंक्चरचे ठिगळ उचकट असल्याने पंक्चरच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच गाड्यांच्या टाकीचा रंग उडत असल्याने काही दुचाकीचालक त्यावर कापड टाकत होते.