कोयना विभागात रस्त्याअभावी पर्यटकांचा वनवास !
By Admin | Updated: August 29, 2014 23:12 IST2014-08-29T21:23:48+5:302014-08-29T23:12:45+5:30
रस्त्यांचा प्रश्न : पर्यटनस्थळांवर सुविधांची वानवा, ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याची भीती

कोयना विभागात रस्त्याअभावी पर्यटकांचा वनवास !
कोयनानगर : कोयनानगरला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते़ मात्र येथील अनेक पर्यटनस्थळे आजही दुर्लक्षित आहेत. ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली आहे. बोपोली येथील आंबामाता मंदिर, ढणकल येथील स्वयंभू महादेव मंदिर, कोंडवळे येथील रामघळ, भैरवगड अशा अनेक स्थळांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे़
कोयना परिसर आर्थिकदृष्ट्या मागास आहे. मात्र, या विभागाला निसर्गाची देणगी लाभली आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथील ठिकाणांना भेटी देतात. मात्र, पर्यटकांसाठी याठिकाणी कसलीही सोय उभारण्यात आलेली नाही.
पर्यटकांचा याठिकाणांकडे ओढा असला तरी सोयीसुविधा नसल्याने अनेक पर्यटक या विभागाकडे पाठ फिरवितात. तसेच काही पर्यटनस्थळे प्रसिद्धीपासून वंचित आहे़ निसर्गशक्तीचा विकासासाठी उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून येथे कोयना जलविद्युत प्रकल्प उभा रहिला आहे़
एमटीडीसी, मिनी महाबळेश्वर यामुळे कोयना परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता लाखोंच्या घरात पाहोचली आहे़ मात्र याच विभागात असणाऱ्याा शिवकालीन व पांडवकालीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाले आहे़ बोपोलीचे आंबामाता मंदिर पांडवकालीन आहे़ मंदिराच्या कळसाचा भाग बांधायचा राहिल्याने ग्रामस्थांनी त्यावर सिमेंटचा कळस बसविला आहे़ मंदिर पूर्वाभिमुख आहे़ उत्तरेकडील भिंतीला असणारी खिडकी पूर्णपणे उघडी असून, दक्षिणेकडील खिडकी अद्भूत प्रकारची आहे़
या खिडकीला असणारे गाळे सहजासहजी मोजता येत नाहीत़ मंदिराच्या दारात पाच फूट रुंद व पाच फूट उंच तुळशी वृंदावन आहे़ मंदिर आवारात भुयार असून या भुयारात पूर्वी कार्यक्रमासाठी लागणारी भांडी व साहित्य होते, असे येथील धोंडिराम भोमकर यांनी सांगितले़ (वार्ताहर)
तीन जिल्ह्यांच्या हद्दीवर कोयना !
सातारा, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांची हद्द कोयना विभागात आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा भैरवगड, कोंडावळे येथील रामघळ, बोपोली येथील आंबामाता मंदिर, जंगली जयगड, तोरणे गावाशेजारील तोरणा खिंड, ढाणकल येथील महादेव मंदिर व सातारा-रत्नागिरी सीमेवरील घटमाथा ही ठिकाणे आजही दुर्लक्षित आहेत़ संबंधित ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. काही ठिकाणी तर दोन ते तीन किलोमीटर पायी जावे लागते. त्यामुळे पर्यटक अशा ठिकाणांना भेटी देणे टाळतात.