‘दादां’वर शिक्कामोर्तब,‘आबां’वर चिंतनाची वेळ!
By Admin | Updated: February 24, 2016 00:27 IST2016-02-24T00:27:38+5:302016-02-24T00:27:38+5:30
कऱ्हाड दक्षिणचं राजकारण : अविनाश मोहितेंची ‘नवी इनिंग’ सुरू

‘दादां’वर शिक्कामोर्तब,‘आबां’वर चिंतनाची वेळ!
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणे ! त्याला ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ तरी कसे अपवाद असणार? म्हणून तर स्वत: थोरल्या पवारांनी दक्षिणच्या घड्याळाचे काटे चक्क अविनाश मोहितेंच्या हातात दिले. वाठारमध्ये हजारोंच्या उपस्थितीत या घड्याळाला चावीपण दिली. ‘इजा बिजा तिजा’ सांगत मोहितेंच्या नेतृत्वावर त्यांनी ‘शिक्कामोर्तब’ केले. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून किंबहुना त्यापूर्वीपासून पवार घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या वाठारकर गटावर, राजेश पाटील आबांवर आत्मचिंतनाची वेळ आली, हे निश्चित.
सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडची ओळख आहे. कऱ्हाड दक्षिण अन् उत्तर असे दोन विधानसभा मतदार संघ असल्याने जिल्ह्याच्या राजकारणातही कऱ्हाडला नेहमीच महत्त्व राहिले आहे. कऱ्हाड दक्षिण मतदार संघावर आजपर्यंत काँगे्रस विचाराचाच पगडा राहिला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनीच या मतदार संघाचे प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदार संघाचे तिसरे आमदार आहेत.
दिवंगत यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी सुरुवातीला काँग्रेसशी फारकत घेत समाजवादी काँगे्रस पक्षाची स्थापना केली. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले अन् विदेशी नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित करीत पुन्हा त्यांचा राष्ट्रवाद जागा झाला. अन् राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना झाली.
या प्रत्येकवेळी शरद पवारांच्या आदेशाची वाट न पाहता विलासराव पाटील-वाठारकरांनी दक्षिणेत पवारांचे विचार रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. समाजवादी काँगे्रसचा ‘चरखा’ त्यांनीच दक्षिणेत फिरविला तर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनीच जबाबदारी स्वीकारली. कऱ्हाड दक्षिणेत प्रस्थापित उंडाळकरांविरोधात नेहमीच वाठारकर दंड थोपटत गेले. त्याला नेत्यांचं ‘बळ’ किती मिळालं अन् त्या साऱ्यांचे वाठारकरांना ‘फळ’ काय मिळालं हा चिंतनाचाच विषय.
विलासराव पाटील-वाठारकरांच्या निधनानंतर राजेश पाटील-वाठारकर त्यांचा वारसा चालवितायत म्हणे ! बापूंच्या पश्चात जनता बँकेची पहिली निवडणूक बिनविरोध करतानाही त्यांना अनेकांच्या नाकदुरी काढाव्या लागल्या. एका ‘राजेंद्र’च्या अर्ज माघारीसाठी कऱ्हाडातील ‘राजेंद्र’ मेहरबानांच्या माध्यमातून सातारच्या थोरल्या ‘राजें’पर्यंत प्रकरण पोहोचलं तेव्हा कुठ यश आलं म्हणे; पण धुसपूस मात्र संपलेली दिसत नाही. हे झालं जनता उद्योग समूहाचं. मात्र, कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणासाठी आणि पक्षासाठी आबा किती वेळ देतात हा दस्तुरखुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच की काय ? शरद पवारांच्या वाठारच्या सभेत अनेक नेत्यांनी विलासराव पाटील-वाठारकरांच्या पश्चात कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीची स्थिती कमकूवत झाली होती. ती मजबूत व्हायला अविनाश मोहितेंची मदत होईल असा सूर आळविला. यातून राजेश पाटलांनी काय संदेश घ्यायचा तो घेतलेला बरा!
वाठारकरांचे पाहुणे असणाऱ्या उत्तरच्या आमदारांनी दक्षिणेत राष्ट्रवादी मजबूत करण्याचा सध्या ‘विडा’ उचललाय म्हणतात. पक्षाच्या दृष्टिने ही बाब चांगलीच आहे; पण यापूर्वी त्यांनी घेतलेल्या भूमिकांच ‘उत्तर’ मूळच्या दक्षिणमधील राष्ट्रवादी जनतेला सापडेनासे झालेय.
राजेश पाटील वाठारकरांनी त्याचा ‘शोध’ घेतला. तर त्यातून त्यांना ‘बोध’ ही निश्चित घेता येईल. अन् त्यातून वेळ मिळालाच तर आबा नक्कीच आत्मचिंतन करतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कारण फक्त कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून अथवा काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी धडपड करून उपयोग तो काय?
पद्वीधरची उमेदवारी पण...
राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने पुणे पद्वीधर मतदार संघासाठी सन २००८ मध्ये राजेश पाटील-वाठारकरांना उमेदवारी दिली गेली. वाठारकर आमदार होणार अशी कार्यकर्त्यांची धारणा झाली; पण ‘दादां’च्या पुण्यातच राष्ट्रवादी ‘उणे’ पडली. तर सांगलीतल्या राष्ट्रवादी नेत्यांनी भलत्याच उमेदवारांचे ‘लाड’ पुरविले. त्यामुळे वाठारकरांच्या पदरात यश पडलेच नाही. त्यांनी पुन्हा तयारी सुरूच ठेवली; पण २०१४ मध्ये ही उमेदवारी कऱ्हाडच्या सारंग पाटलांना मिळाली.