‘तळहिरा’त केवळ २५ टक्केच पाणी
By Admin | Updated: September 11, 2014 23:01 IST2014-09-11T22:15:27+5:302014-09-11T23:01:48+5:30
दुष्काळाचे सावट : शेतकऱ्यांच्या अजूनही पावसाकडेच नजरा

‘तळहिरा’त केवळ २५ टक्केच पाणी
वाठार स्टेशन : जिल्हाभर हाहाकार घालणाऱ्या पावसाने अनेकांना दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार स्टेशन, देऊर, तळिये गावांच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही जैसे थे आहे. या सर्वच गावांची तहान भागविणारा तळहिरा तलाव उद्याप २५ टक्के देखील भरला नसल्याने या गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.
१९९९ नंतर अपवादात्मकरीत्या सलग दोन-तीन वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर २००४ मधील दुष्काळात हा तलाव कोरडा पडला होता. त्यानंतर २००६-०७ मध्ये हा तलाव एकवेळच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला होता. त्यानंतर आज अखेर म्हणजे, जवळपास पाच ते सहा वर्षांत तलाव अद्याप भरलाच नसल्याने चालूवर्षी तरी हा तलाव भरणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १९७७ पासून दिवंगत माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या प्रयत्नातून या तलावाची संकल्पना कागदावर आली आणि त्यानंतरच हा तलाव साकारण्याचे काम नजीकच्या काही वर्षांत पूर्ण झाला.
या तलावाचा सर्वाधिक लाभ तलावाखालील देऊर गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. याच तलावाखाली वाठारस्टेशन स्वजलधारा विहीर काढण्यात आली असून, तळिये गावसाठीही याच धरणपात्रातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे या तलावावरच या तिन्ही गावांचा पाणीप्रश्न अवलंबून
आहे. (वार्ताहर)
सद्य:स्थितीत वाठार स्टेशन, देऊर, तळिये या गावांच्या पश्चिमेस पाऊस झाल्याने वसना नदीत थोडेफार पाणी आहे. परंतु हे पाणी काही दिवसांतच बंद पडणार असल्याने दुष्काळाची तीव्रता आजही भेडसावत आहे. देऊरकरिता आजही चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला पाऊस या भागात तरी समाधानकारक नसल्याचाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.