तहानलेल्या पक्ष्यांचा जीव ‘भांड्यात पडला’!

By Admin | Updated: April 10, 2016 22:20 IST2016-04-10T22:20:24+5:302016-04-10T22:20:24+5:30

भुर्इंजच्या युवकांची धडपड : भवानी टेकडीवर शेकडो पाखरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय

Thirsty birds 'lives' in the pot! | तहानलेल्या पक्ष्यांचा जीव ‘भांड्यात पडला’!

तहानलेल्या पक्ष्यांचा जीव ‘भांड्यात पडला’!

भुर्इंज : प्रचंड दुष्काळामुळे गेल्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सैरभैर झालेल्या पाखरांची तहान भागवण्यासाठी भुर्ईंजच्या हिंंदुस्थानी युवा ग्रुपने आसले येथील भवानी टेकडीवर ६० भांड्यांद्वारे शेकडो पाखरांची पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या ग्रुपच्या युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून केलेली ही भूतदया परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की १९७२ नंतर प्रथमच भुर्इंज व परिसराला कधी नव्हे ते पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुढील दोन महिन्यांत काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे काम येथील हिंंदुस्थानी युवा ग्रुपने हाती घेतले.
पाणी बचतीचा संदेश देणारी हजारो पत्रके परिसरातील घरोघरी वाटण्यात आली आहेत. त्याचवेळी माणसांना अद्यापही पाणी पिण्यास मिळत असले तरी भवानी टेकडीवरील पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही काळजी या युवकांनी वाहिली. या ग्रुपचे सदस्य आणि किसन वीर कारखान्याचे अधिकारी अमोल भोसले यांनी टेकडीवरील झाडांवर पिण्याच्या पाण्याची भांडी बसवण्याची संकल्पना मांडली. त्यास अध्यक्ष दीपक साळुंखे, धनंजय गोरे, अभिजित जाधव, विठ्ठल भोसले, संग्राम भोसले, दीपक भोसले, संदीप भोसले आदी सर्वच सदस्यांनी पाठिंंबा देत ती प्रत्यक्षात साकारली. त्यातूनच टेकडीवरील ६० झाडांवर अशा प्रकारची भांडी बसवण्यात आली आहेत.
ग्रुपचे सदस्य तसेच टेकडीवर फिरावयास येणारे लोक भांड्यात पाणी भरत असतात. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची वर्दळ पाहता हिंंदुस्थानी युवा ग्रुपच्या या उपक्रमाचे महत्त्व लक्षात येत असून त्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)

उन्हाळा सुसह्य होण्यासाठी...
कधी नव्हे तो यंदा तीव्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिवघेण्या उष्म्यामुळे जीवसृष्टीची तगमग सुरू आहे. पाणीटंचाईचे संकट तर सर्वांनाच भेडसावत आहे. घरात काटकसर करून वाचविलेले पाणी पशुपक्ष्यांसाठी देणे शक्य आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पाणीबचत करणे गरजेचे आहे.

Web Title: Thirsty birds 'lives' in the pot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.