चोरट्यांनो रस्त्यावर या, पोलीस वाट पाहतायत!
By Admin | Updated: May 23, 2014 22:55 IST2014-05-23T22:48:31+5:302014-05-23T22:55:17+5:30
खाकीची ‘आयडिया’ची कल्पना : वाहनांसह कागदपत्रांची तपासणी; मोहीम होणार का फत्ते?

चोरट्यांनो रस्त्यावर या, पोलीस वाट पाहतायत!
संजय पाटील; कºहाड : पोलीस खातं जे बोलतं ते करत नाही आणि जे करायचं असतं ते बोलून दाखवत नाही, असं म्हणतात; पण कºहाडच्या पोलिसांनी सध्या नेमकं याच्या उलट केलंय. वाहनचोरांना पकडण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनांची तपासणी करण्याचं ‘मिशन’ त्यांनी हाती घेतलंय. मात्र, मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांनी त्याचा गाजावाजा केलाय. जे गोपनीय पद्धतीने करायचं तेच त्यांनी बोलून दाखवलंय. नुसतं बोलून नव्हे तर अगदी जगजाहीरच केलंय. त्यामुळं पोलिसांची चोर पकडण्याची ही ‘आयडिया’ निव्वळ कल्पनाच ठरण्याची चिन्हं आहेत. वाहनचोरी ही जिल्ह्यातल्या प्रत्येक शहराची डोकेदुखी आहे़ रस्त्याकडेला, गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली वाहनं हातोहात लंपास केली जातायत. चोरीस जाणार्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे आणि एकदा दुचाकी चोरीस गेली की ती मिळेल की नाही, हेसुद्धा सांगता येत नाही़ दुचाकी चोरीस गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतो़ त्याच्या तक्रारीनुसार चोरीची ‘एफआयआर’ही दाखल होते; पण पुढे त्याचं काहीच होत नाही़ चोरीस गेलेली दुचाकी शोधणं पोलिसांनाही जिकिरीचं बनतं़ एखाद्या वेळी दुचाकीचोरांची साखळी उघडकीस आलीच तर अपवाद वगळता ठरवून अशी कारवाई होत नाही. खबर्याकडून खबर मिळाल्यानंतर अथवा वाहन तपासणीदरम्यान संशयास्पद दुचाकी किंवा कागदपत्रं आढळून आल्यानंतर चोरीची दुचाकी पोलिसांच्या हाती लागते़ एकापाठोपाठ अनेक दुचाकी त्या चोरट्याकडून हस्तगत होतात़ कºहाड शहर पोलिसांनी यापूर्वीही अशी टोळी उघडकीस आणली आहे; पण वाहनचोरांना पकडण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सध्या नवीनच क्लृप्ती लढवली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने दोन दिवसांपासून वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेनुसार शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकाचौकात पोलीस कर्मचार्यांकडून वाहनांची तपासणी केली जातेय. वाहनाची स्थिती तसेच कागदपत्रं यावेळी तपासली जातायत. वास्तविक, ही मोहीम परिणामकारक असली तरी ती राबवताना पोलिसांनी गोपनीयता बाळगणं आवश्यक होतं. मोहिमेचा डंका पिटण्याची आवश्यकता नव्हती. अचानकपणे ही मोहीम राबविली गेली असती तर वाहनचोरीचे प्रकार उघडकीस येण्यास कदाचित मदत झाली असती; पण पोलिसांनी मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वीच तिचा गाजावाजा केला. २१ मेपासून या मोहिमेस प्रारंभ होत असताना दोन दिवस अगोदरच पोलिसांनी या मोहिमेची ‘प्रेस नोट’ प्रसिद्धीमाध्यमांना दिली. कोणत्या तारखेला, कोणत्या वाहनाची आणि कोणती तपासणी करण्यात येणार, याचे नियोजनच पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवलं. वाहनधारकांनी या मोहिमेवेळी आपल्या वाहनांची कागदपत्रं सोबत ठेवावीत; तसेच वाहनही सुस्थितीत ठेवावे, असं आवाहन पोलिसांनी केलं. पोलिसांच्या वाहन तपासणीचं हे ‘नियोजन’ जगजाहीर झाल्यामुळं सामान्य वाहनधारकांसह चोरीचे वाहन वापरणारे किंवा वाहन, त्याची कागदपत्रं सुस्थितीत नसणारेही जागे झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ही मोहीम चालणार, तोपर्यंत ते वाहन घेऊन रस्त्यावर येण्याचं टाळणार, हे मात्र निश्चित!