वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

By Admin | Updated: May 27, 2016 22:20 IST2016-05-27T21:28:34+5:302016-05-27T22:20:48+5:30

कुठे दडलाय पाऊस? : मान्सून अंदमानात; पण जिल्ह्यात केवळ काळ्या नभाच्या वाकुल्या--दुष्काळी व्यथा...

They turned their faces in front ... ... they formed their limbs! | वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

सातारा : मे महिना अखेरपर्यंत वळवाने सातारकरांना केवळ वाकुल्या दाखविल्या. काळे ढग जमून आले; पण कुठेतरी नुसते ‘भुंरगाट’ पडले, याने ना पिण्याच्या पाण्याची सोय झाली, ना रानातले नांगरटीचे ढेकूळ फुटले! ४२ अंशावर गेलेल्या पाऱ्यामुळे अंग करपून निघाले, कवी कल्पनेतल्या चातक पक्ष्यासारखी जिल्ह्यातल्या लोकांची अवस्था होऊन बसली असून, पाऊस कुठे दडून बसलाय?, असा प्रश्न जो-तो विचारत आहे.
जिल्ह्यावर न भूतो...न भविष्यती, अशा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. १९७२ मध्येही जेवढा नव्हता, त्यापेक्षाही मोठा व भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
फलटण तालुक्यात सर्वात कमी ९४.६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मिमी इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्या खालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मिमी म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे.
वळवाने दुष्काळी भागात काही ठिकाणी हजेरी लावली, जलयुक्त शिवारच्या कामांमुळे काही ठिकाणी बंधारे भरले; पण वळीव पाऊस सर्वत्र सारखा पडत नसल्याने एका गावात पाणी तर लगतच्या गावात कोरड, अशी वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात धरणे आहेत, या धरणांतून पिण्याच्या पाण्याची सोय झाली, आता मात्र ही धरणेही तळ गाठू लागली आहेत. या परिसरात वळवाने हुलकावणी दिली असल्याने धरणे कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमानमध्ये हजेरी लावली, तो पुढे सरकत केरळमार्गे देशात दाखल होईल, तोपर्यंत पाण्यावाचून तगमग कायम राहणार आहे, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.(प्रतिनिधी)


नशिवारं मोकळी...
पाण्याअभावी अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाच्या बागा करपून गेल्या. सर्वात जास्त पाणी लागणारे उसाचे पीकही अल्प प्रमाणात उरले आहे. शिवारं मोकळी ठाक पडली आहेत. उन्हाळी पिके तर झालीच नाहीत. नांगरटीचे ढेकूळही अद्याप फुटलेले नाहीत. आता खरिपाची पेरणी कशी होणार?, हा प्रश्न आहे.

Web Title: They turned their faces in front ... ... they formed their limbs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.