मनी नसे तिथेही आता बिबट्या दिसे!
By Admin | Updated: June 20, 2014 00:29 IST2014-06-20T00:26:39+5:302014-06-20T00:29:44+5:30
वनविभागाचा भरवसा पिंजऱ्यावर

मनी नसे तिथेही आता बिबट्या दिसे!
संजय पाटील कऱ्हाड
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढेच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. या हिंस्र श्वापदाचा वावर वाढला असताना त्याला पकडण्यासाठी वन व वन्यजीव विभागाकडे कोणतीही तातडीची उपाययोजना नाही, हे विशेष! अद्यापही हे दोन्ही विभाग फक्त पिंजऱ्याच्याच भरवशावर आहेत.
कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी त्याने पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कऱ्हाड तालुक्यात पाठरवाडी, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, चचेगाव, विंग, आणे, येणके या भागातच बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जायचे. मात्र, कालांतराने या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला. त्याने मानवीवस्तीत घुसून अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. सध्या बिबट्यांचा वावर एवढा वाढला आहे की, कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. वनविभागानेही दोन्ही तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट केले आहे; पण बिबट्या मानवीवस्तीत घुसला अथवा एखाद्या ठिकाणी अडकला तर त्याला पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वनखात्याकडे कोणतीही तातडीची उपाययोजना नाही. वनखात्याकडे फक्त लोखंडी पिंजरे, दोरखंड, वागर व जाळी एवढेच साहित्य आहे. या साहित्याच्या आधारे बिबट्याला पकडणे वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहजशक्य नाही.
कऱ्हाड तालुक्यातील येणके येथे मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला साहित्याअभावी वनविभाग जेरबंद करू शकला नव्हता. संतप्त ग्रामस्थांनी त्यावेळी संबंधित बिबट्याला ठार केले होते. त्यानंतर ९ जानेवारी २०११ रोजी कऱ्हाड शहरात बिबट्या घुसला. त्यालाही जिवंत पकडण्यात वनविभाग अपयशी ठरला. मानवी जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी गोळी घालून त्या बिबट्याला ठार केले. त्यानंतर पाटण बसस्थानक परिसरातही एका बिबट्याने शिरकाव केल्याची घटना घडली होती. या घटनांतून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, साहित्याअभावी बिबट्या पकडता येत नाही. परिणामी, बहुतांशवेळा बिबट्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
ज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते अशा ठिकाणांची वनविभागाकडून नोंद ठेवली जाते. यावर्षी पूर्वीच्या नोंदींसह आणखी ३९ ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचे वनविभागाची आकडेवारी सांगते. यावरून विभागात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही वाढती संख्या व मानवी वस्तीत होणारा शिरकाव लक्षात घेता वन व वन्यजीव विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.