रेशनकार्डही नाही... अन् धान्यही नाही!
By Admin | Updated: November 9, 2015 23:28 IST2015-11-09T21:34:37+5:302015-11-09T23:28:19+5:30
पाटण : जनता दरबारात तक्रारींचा डोंगर

रेशनकार्डही नाही... अन् धान्यही नाही!
पाटण : तालुक्यातील अनेक लोकांना अद्याप रेशनकार्ड मिळालेली नाहीत. तर गावागावांतील धान्य दुकानदार धान्य देत नाहीत. याबाबत पाटणला घेतलेल्या जनता दरबारात तक्रारींचा डोंगर आल्यानंतर आमदार शंभूराज देसार्इंनी याबाबतच्या तक्रारींची स्वत: तहसीलदारांनी पंधरा दिवसांत चौकशी करावी. लोकांना धान्य वेळेत मिळाले पाहिजे, अशा सूचना केल्या.
पाटण तहसील कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार देसाई बोलत होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अरविंद पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे व सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
म्हावशी येथील संस्थेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाचा चालक ज्ञानदेव गावडे बिगर पावतीने धान्य वाटप करतात. कसलेही रेकॉर्ड ठेवत नाहीत. याला पुरवठा शाखेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत, अशी तक्रार करण्यात आली.
दारिद्र्यरेषेखाली समावेश करावी, अशी अनेक गरजू महिलांनी यावेळी मागणी केली. तर घरकूल मिळत नाही आणि रेशनकार्ड बोगस असल्याचे दुकानदार सांगत असून, धान्य देत नसल्याची तक्रार आमदार देसाई व तहसीलदारांसमोर करण्यात आली. मूळगाव येथील पाणलोट कामाची चौकशी करावी, अशी मागणी उत्तम मोळावडे यांनी केली. मरळी वीज कार्यालयातील कालेकर नावाचा अधिकारी लोकांना उर्मट बोलत असून, पापर्डे गावातील एका शेतकऱ्याची त्याने अडवणूक केल्यामुळे सहा महिने झाले तरी ट्रान्सफॉर्मर बसविला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही, पिके वाळली आहेत.
‘पाटण तालुका डोंगरी असून, या तालुक्यात तीन डॉक्टर द्या,’ अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली असल्याचे आमदार म्हणाले. शांतीसागर पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्याचे पैसे मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
आजीबार्इंकडे आमदारांचा मोबाईल नंबर
घोट येथील सोनवले नावाच्या वृद्ध महिलेने जनता दरबारात ‘घरकूल द्या’ म्हणून पुन्हा मागणी केली. त्यावर आमदारांनी ‘आजीबाई तुमची दखल घेतली आहे. संबंधित अधिकारी तुमच्या घरी येतील नाही आले तर मला सांगा,’ त्यावेळी आजीबाई पटकन म्हणाल्या की, ‘तुमचा नंबर माझ्याकडे आहे.’ यावर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले.
गवळीनगर रस्त्याचे काम अर्धवट
मोरणा विभागातील गवळीनगर रस्त्याचे काम पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून, याबाबतची तक्रार गवळीनगर (कोकिसरे) येथील ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच मोरणा-गुरेघर प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यामुळे आंबेघर तर्फ मरळीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला मिळावा, अशी तक्रार झाली