...तर ‘सह्याद्री’विरोधात रस्त्यावर उतरु
By Admin | Updated: June 10, 2014 02:15 IST2014-06-10T01:31:42+5:302014-06-10T02:15:50+5:30
धैर्यशील कदम : दुसरा हप्ता ५०० रुपयाने देण्याची मागणी

...तर ‘सह्याद्री’विरोधात रस्त्यावर उतरु
कऱ्हाड : साखरेचे वाढलेले दर, कारखान्यावर नसलेले कोणतेही भांडवली कर्ज, केंद्र सरकारने दिलेली बिनव्याजी रक्कम या पार्श्वभूमीवर सह्याद्रि साखर कारखान्याने उसाचा दुसरा ५०० रुपयांनी शेतकरी सभासदांना द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कऱ्हाड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सध्या साखरेचे दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले आहेत. सह्याद्रि कारखान्याने अंदाजे १४ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी उतारा १२ टक्के एवढा धरल्यास एक टन ऊसापासून १२०० किलो साखर तयार होते. सध्याचा साखरेचा दर ३१०० रुपये प्रति क्विंटल लक्षात घेता एक टन ऊसापासून ३७५० रुपयांची साखर तयार होते. तोडणी व वाहतूक असा सर्व खर्च ८०० रुपये प्रति टन धरला तर शेतकऱ्यांना २९२० रुपये प्रतिटन मिळायला हवेत.
सह्याद्रि कारखाना मद्यविक्री, बगॅस विक्री व अल्कोहोलचीही विक्री करतो या सर्व उपपदार्थाच्या विक्रीतील नफा लक्षात घेतला तर चालु हंगामात सह्याद्रिने ३५०० रुपयांचा अंतिम दर द्यावा. तसेच ५०० रुपयांनी दुसरा हप्ता सभासद शेतकऱ्यांना द्यावा, अशी आमची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने कारखान्यांना मदत म्हणून प्रतिक्विंटल ३३० रुपये बिनव्याजी दिले आहेत. त्यामुळे साखर साठवणुकीत ३०० रुपये व्याजाची बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुसरा हप्ता ५०० रुपयांनी देणे कारखान्याला जड नाही.
कारखाना नेतृत्वाने इथल्या सभासद शेतकऱ्यांचे हित जपावे. इतर कारखान्यांच्या दराची तुलना त्यांनी करु नये. गेल्या वेळी एका नेत्याच्या दबावाला पडून त्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान केले होते. शेतकऱ्यांनी स्वकष्टाने कारखाना उर्जितावस्थेत आणला आहे. पदरमोड करुन विस्तारवाढीचे नाहक कर्ज फेडलेले आहे. त्यामुळेच आज कारखाना कर्जमुक्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा तो हक्क आहे. आमची मागण मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यांनी
दिला. (प्रतिनिधी)