यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा : बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांनाही मान

By नितीन काळेल | Updated: June 15, 2025 14:48 IST2025-06-15T14:46:42+5:302025-06-15T14:48:01+5:30

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय.

The steward of Satara, Maharashtra- | यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा : बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांनाही मान

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा : बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांनाही मान

नितीन काळेल

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. त्यामुळे जिल्ह्याने राज्याला आतापर्यंत एक-दोन नाही तर चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० ला झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत मुख्यमंत्रिपदी होते. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. तर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. जानेवारी १९८२ मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे काही कारणाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. तेव्हा पक्षाने बाबासाहेब भोसले यांना संधी दिली. भोसले हे मुंबईतील त्यावेळच्या नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण, त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाल राहिला. बाबासाहेब भोसले हे मुळेच खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे.

२००९ मध्ये राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. त्यावेळी काही कारणाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. तर १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला. चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे तिसरे मुख्यमंत्री ठरले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उठाव झाला. एकनाथ शिंदे भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले. जवळपास अडीच वर्षे ते मुख्यमंत्रिपदी राहिले. ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. पण, ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत. ते गावाला नेहमीच येतात. एकनाथ शिंदे यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला चाैथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

तिघे काँग्रेसचे; एक सेनेचा, पण पूर्ण वेळ नाही...

सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री राज्याला दिले. यातील तिघे राष्ट्रीय काँग्रेसचे होते. तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण, या चाैघांनाही पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.

शरद पवारही सातारा जिल्ह्यातील...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीचे. त्यांनीही चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले. पण, पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या नांदवळ गावचे. यामुळे सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मुख्यमंत्री मिळाले, असेच म्हणावे लागेल.

Web Title: The steward of Satara, Maharashtra-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.