संजय पाटीलकऱ्हाड : पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. सध्या ग्रामीण भागात पावसासह इतर काही पर्जन्यदूत आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात.निसर्ग निरीक्षणातून शेतकरी पावसाचा अंदाज बांधतात. या निसर्ग निरीक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची असते. पक्ष्यांच्या हालचाली, त्यांच्या कृती, रंगात होणारा बदल, सुरेल आवाजासह त्यांच्या घरटी बांधण्याच्या पद्धतीवरून पावसाचा अंदाज लावता येत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. सध्या हवामानात झालेला बदल आणि गावोगावच्या शिवारात पर्जन्यदूत असलेल्या पक्ष्यांच्या हालचाली पाहता सुखसरी लवकरच बरसतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
आफ्रिकेतून येणारा चातकपावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून येणारा चातक पक्षी सर्वप्रथम देतो. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ..’ अशा सांकेतिक आवाजात ओरडायला लागला की, पाऊसकाळ जवळ आला, असे समजले जाते.
‘पेरते व्हा’ म्हणणारा पावशा..पावशा हा पक्षी पर्जन्यदूत मानला जातो. ‘पेरते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की, शेतकरी आजही मशागतीच्या कामाला सुरुवात करतात, हे विशेष.
तित्तीर पक्षाचा सांकेतिक स्वरअंगावर काळे-पांढरे ठिपके असलेला तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको, कोड्यान केको’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की, पाऊस येणार असे शेतकरी समजतात.
नवरंग देतो पावसाची वर्दीनवरंग पक्षी पावसाची वर्दी देतो आणि त्याच्या विशिष्ट आवाजाने पावसाची चाहूल लागते, असे पक्षी अभ्यासक सांगतात. शेतकरीही नवरंग पक्षाच्या आवाजावर पावसाचा अंदाज बांधतात.
पावसाचे संकेत देणारे इतर पक्षीतिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, छोटा खंड्या हे पक्षी मे महिन्यात पावसाची चाहूल दर्शवतात. तसेच, पाणकोंबडी आणि मोर हे पक्षी पावसाळ्यापूर्वी ओरडून पूर्वकल्पना देतात. कोकीळ, कावळा आणि चिमणीही आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
प्रजनन काळात बरेच पक्षी अधिक सक्रिय आणि विशिष्ट आवाज करणारे असतात, जे बहुतेकदा पावसाळ्याशी जुळते. काही पक्षी पावसाळ्यात विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये किंवा वर्तन प्रदर्शित करतात. चमकदार पंख किंवा विशिष्ट आवाज काढतात. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड
पक्षी विविध प्रकारे मान्सूनच्या आगमनाचे संकेत देऊ शकतात. पक्ष्यांच्या वर्तनात काही बदल होतात. हालचालीत वाढ होते. पावसाळा जवळ येताच ते अधिक सक्रिय आणि सुरेल आवाज काढतात. सध्या ग्रामीण भागात पक्ष्यांच्या अशा हालचाली दिसून येत आहेत. - डॉ. सुधीर कुंभार, पक्षी अभ्यासक, कऱ्हाड