सांगा.. 'भाऊचा ठेका' घेणार कोण?
By Admin | Updated: June 16, 2014 12:18 IST2014-06-16T12:18:54+5:302014-06-16T12:18:54+5:30
दुष्काळी माण-खटाव मतदार संघात राजकीय नेत्यांचा मात्र भलताच सुकाळ बुवा.कुणी भाऊ, कुणी तात्या, तर कुणी भैय्या.प्रत्येकालाच वाटतंय, 'म्हसवड-मुंबई गाडीत मीच बसणार!'

सांगा.. 'भाऊचा ठेका' घेणार कोण?
>'घड्याळबाबा' अस्वस्थ : दोन भाऊ, एक तात्या अन् एक भैय्या लागले कामाला
सचिन जवळकोटे■ सातारा
दुष्काळी माण-खटाव मतदार संघात राजकीय नेत्यांचा मात्र भलताच सुकाळ बुवा.कुणी भाऊ, कुणी तात्या, तर कुणी भैय्या.प्रत्येकालाच वाटतंय, 'म्हसवड-मुंबई गाडीत मीच बसणार!' ..पण या सर्वांसमोर एकच प्रश्न उभा ठाकलाय. तो म्हणजे 'भाऊचा ठेका घेणार कोण?' ..कारण हा भाऊम्हणे सगळ्या जगाचा 'ठेका' घेतो, पण याच्या 'पराभवाचा ठेका' घेणार्याचं नाव काही लवकर पुढं येईनासं झालंय.
पूर्वीच्या काळी माण पट्टय़ात अंमल केवळ सदाशिव पोळ यांचाच.तात्या म्हणतील तीच दिशा ठरायची;परंतु पाच वर्षांपूर्वी जयकुमार गोरेंनी आमदारकीचं मैदान मारलं. पवारांच्या लोकसभा मतदारसंघातच 'राष्ट्रवादी'चा पराभव व्हावा, ही गोष्ट जिल्ह्यातल्या नेत्यांच्या मनाला लागली.त्यांनी गेल्या चार-साडेचार वर्षांत संधी मिळेल तेव्हा गोरेंवर शाब्दिक हल्ला चढवला.जिथं-जिथं शक्य होतं, तिथंगोरेंना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला;परंतु हाय.. गोरेहीे भलतेच वस्ताद निघालेले.पवार काका-पुतण्यासह रामराजे अन्शशिकांत शिंदेंची कसलीही भीडभाड न ठेवता उलट त्यांनी त्यांच्यावरच आक्रमक प्रतिहल्ला केलेला.
'मोगराळे अन् वर्धनगड' घाट चढून वर येणार्या नेत्यांचा बंदोबस्त त्यांच्याच गावात करण्याची खेळीही याच गोरेंनी लोकसभेला खेळलेली.फलटणमध्ये रणजितसिंहांना उचकवून बसविण्यात त्यांचा जसा मोठा हात, तसाच कोरेगावातील काँग्रेस मंडळींना भडकविण्यातही म्हणे त्यांचाच पुढाकार.लोकसभेला पालकमंत्र्यांच्या तालुक्यात येऊन 'आघाडी'च्या व्यासपीठावर थेट 'घड्याळ बंद पाडण्याची भाषा' वापरणारा हा नेता कदाचित जिल्ह्यात एकमेव ठरलेला.
तर असा हा उधळलेला वारू अडविण्यासाठी सदाशिवतात्या अन् अनिलभाऊ उत्सुक. गुलाबराव पोळही अत्यंत शांतपणे पै-पाव्हण्यांची 'लिंक' जोडत निघालेले.असं असलं तरी 'पायात पाय घालण्याची सवय' यंदाही 'राष्ट्रवादी'ला घातक ठरण्याचीे शक्यता. पक्षातले सर्व गट-तट एकत्र आले तरच गोरेंना सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही आजपावेतो ही मंडळी काही गटबाजीच्या मानसिकतेतून बाहेर न आलेली.
असो. 'आपल्यासमोर एकही तगडा उमेदवार नाही!' या भ्रमात जयकुमार असले तरी त्यांच्याच घरातला एक भाऊ आजकाल ज्या पध्दतीनं वागतोय, बोलतोय, फिरतोय.. ते पाहून अनेकांना आगामी निवडणुकीतल्या 'भन्नाट गमती-जमती'ची चुणूक लागलेली.'माण-खटावचा आमदार मीच ठरविणार' अशी राणा भीमदेवी घोषणा करणारे शेखरभाऊ लोकसभेला राष्ट्रवादीसोबत राहिलेले.तीन-चार हजार कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन जेव्हा ते राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला मोठय़ा जोषात सामील झाले होते, तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या अजित पवारांचेही डोळे क्षणभर चमकले होते.शेखरभाऊंना न्याहाळताना अजितदादांच्या नजरेत त्याक्षणी कोणते भाव होते, हे कुणाच्या नीट लक्षात आलं नाही; मात्र त्याचदिवशी तिकडं अकलूजमध्ये कुठंतरी प्रतापसिंह म्हणे आर्तपणे कळवळून सांगत होते, 'घराघरात भांडणं लावून आजपर्यंत बारामतीच्या पवारांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेतली!' ..आता अकलूजच्या वाड्यातली ती 'वेदनेची तीव्रता' न समजण्याइतपत जयकुमार नक्कीच भोळे नसावेत, म्हणूनच घरातला हा नाजूक गुंता ते नेहमीप्रमाणं किती चाणाक्षपणे सोडवितात, याकडेच 'माण-खटाव'मधल्या जनतेचं बारीक लक्ष!