भाजीबरोबर जिवाचीही काळजी घ्या..!
By Admin | Updated: December 5, 2014 23:39 IST2014-12-05T21:00:36+5:302014-12-05T23:39:44+5:30
साताऱ्यातील चित्र : मंडईच्या संघटनांचा वाद बेततोय जिवावर

भाजीबरोबर जिवाचीही काळजी घ्या..!
सातारा : येथील जुना मोटार स्टँड व महात्मा फुले भाजी मंडई यांच्या वादात मंडई रस्त्यावर आली आहे. मुळातच जुना मोटार स्टँडचा रस्ता अरूंद असून यामध्येच भाजी विक्रेते बसत असून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना लागूनच वाहने जात असल्याने ग्राहकांना जीव मुठीत घेऊनच येथे भाजी खरेदी करावी लागत आहे. या दोन्ही संघटना जागेच्या वादावरून कोर्टात गेले असले तरी ग्राहकांच्या संरक्षणासंदर्भात पालिका व संघटना यांनी हात वर केले आहेत.
शहरातील नावाजलेली मंडई म्हणून जुना मोटार स्टँडवरील मंडईकडे बघितले जाते. आजही या मंडईत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग भाजी विक्रीसाठी येत आहे तर ग्राहकांचाही कल या मंडईकडे मोठा असल्याने रविवार आणि गुरुवारी मंडईत मोठी गर्दी असते तर याच मंडई परिसरात अवजड वाहने दुरुस्तीची दुकाने, पेट्रोल दवाखाने यांचाही समावेश असल्याने वाहनांची वर्दळ येथे सतत असते. बाजारादिवशीतर येथील वाहतुकच ठप्प होत आहे.
दरम्यान महात्मा फुले भाजी मंडईही मागील दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली. पाणी, लाईट, कट्टे, शौचालय अशा सर्व सोयीनियुक्त ही भाजी मंडई बांधली असून जुनी मंडई याठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली. परंतु अनेक वर्षांपासून काही भाजी विक्रेते सध्या मंडईतच बसत आहेत. यावरून दोन्ही मंडईतील संघटनांनी कोर्टात धाव घेतली आहे. ही मंडई कोठे भरवायची याचा निकाल लागला नसल्याने विक्रेते आता जुन्या मोटार स्टँड रस्त्यावर बसतात. त्यामुळे संपूर्ण रहदारीच ठप्प झाली आहे. काही मद्यपीही येथे बेधडक वाहने वालवित आहेत अनेकदा वाहनधारक व ग्राहकांची हमरीतुमरी झाली आहे. स्टँडवर अवडज वाहनांची मोठी संख्या आहे. यामुळे येथून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. आज यामुळे येथे कोणताही अनर्थ होऊ शकतो. याची कल्पना देऊनही वाहतुक पोलीस, पालिका आणि मंडईची संघटना गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ग्राहक मंडईत काळजी घेत भाजी घेत आहेत. (प्रतिनिधी)
बाजारादिवशी धोका अधिक
गुरुवार व रविवार या मंडईच्या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्याच्या मधोमध आपली दुकाने लावून विक्री करतात. अनेकवेळा भाजी घेताना ग्राहकांना वाहनांचा धक्का लागत आहे. बाजारदिवशी अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपाल्याच्या पाट्या ठेवल्याने यात वाहने यात अडकून राहत होती तर काही वेळा वाहने ग्राहकांना धक्का देऊन पुढे जात होती.
बाजारादिवशी धोका अधिक
गुरुवार व रविवार या मंडईच्या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्याच्या मधोमध आपली दुकाने लावून विक्री करतात. अनेकवेळा भाजी घेताना ग्राहकांना वाहनांचा धक्का लागत आहे. बाजारदिवशी अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपाल्याच्या पाट्या ठेवल्याने यात वाहने यात अडकून राहत होती तर काही वेळा वाहने ग्राहकांना धक्का देऊन पुढे जात होती.