दुष्काळबाधितांच्या निधीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या !
By Admin | Updated: May 25, 2016 23:29 IST2016-05-25T21:39:35+5:302016-05-25T23:29:17+5:30
कऱ्हाडात आंदोलन : तहसीलदारांना निवेदन; प्रशासनातील हलगर्जीपणा

दुष्काळबाधितांच्या निधीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या !
कऱ्हाड : मसूरपूर्व भागातील काही दुष्काळबाधित गावांमधील शेतकऱ्यांना प्रशासनातील हगर्जीपणामुळे अद्यापही दुष्काळी निधी मिळालेला नाही. गावातील गावकामगार तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या चुकीच्या नोंदीमुळे व कामचुकारामुळे बरचसे शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ निधी द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, योगेश झांबरे, राजेंद्र पाटील, प्रवीण शिंदे, तुकाराम कुंभार, आप्पासो शिंदे, सुखदेव शिंदे, रमेश पाटील, पोपट जाधव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.नायब तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळी निधी वाटपाबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन शेतकऱ्यांना दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासनातील काही ठराविक लोकांच्या गैरकारभारामुळे दुष्काळी निधी हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पीक-पाण्याच्या चुकीच्या नोंदी करणे, शेतकऱ्यांचे चुकीचे बँक खाते क्रमांक देणे तसेच खातेदारांच्या नावांमध्ये चुका करणे, अशा प्रकारची कामे केल्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये मात्र, या आत्महत्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ नयेत याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मदत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा. (प्रतिनिधी)
कऱ्हाड तहसीलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.