‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची न्यायालयात हजेरी

By Admin | Updated: August 25, 2015 23:46 IST2015-08-25T23:46:08+5:302015-08-25T23:46:08+5:30

कोरेगावात गुरुवारी पुन्हा सुनावणी : शेट्टी, खोत, शिंदे यांची जामिनावर सुटका

'Swabhimani' leaders appear in court | ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची न्यायालयात हजेरी

‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची न्यायालयात हजेरी

कोरेगाव : तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातील तीन गुन्ह्यांमध्ये वॉरंट निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व जिल्हाध्यक्ष शंकर शिंंदे हे मंगळवारी कोरेगाव न्यायालयात हजर झाले. तिघांनी जामीन दिला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. हिंगसे यांनी याप्रकरणी गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा आदींसह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरेगाव आणि परिसरात तीव्र आंदोलने केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याच अनुषंगाने न्यायालयाने चौघांच्या विरोधात पकड वॉरंट काढले होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या परवानगीने खा. शेट्टी यांच्या विरोधातील वॉरंटची बजावणी करण्याचे निर्देश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांनी दिले होते. या प्रकरणाची दि. २५ आॅगस्ट २०१५ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व जिल्हाध्यक्ष शंकर शिंंदे हे जिल्हा संघटक संजय भगत, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुतार व तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. न्या. एस. एन. पाटील हे रजेवर असल्याने न्या. एस. एम. हिंगसे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे अ‍ॅड. कदम यांनी तिघांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांसाठी तिघांनी स्वतंत्रपणे जामीन दिल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनात आमच्या विरोधात हजारो खटले दाखल झाल्याचे सांगितले. आम्ही संविधान, न्यायव्यवस्थेचा आदर करुन त्यांचे पालन करत असल्याचे सांगितले. सध्या कांद्याच्या दराबाबत विनाकारण आदळआपट होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आणि पुरवठा कमी झाल्यावर दरवाढ होणार, हे लक्षात घेतले पाहिजे. आज शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात, म्हणून आरडाओरड करणे योग्य नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना कांदा पिकात तोटा आला अगदी दोन रुपये किलो दराने कांदा विकावा लागला, काहींनी तर आर्थिक अडचणीत आल्याने आत्महत्या केल्या, त्यावेळी ओरड करणारे कोठे गेले होते, असा सवाल खा. शेट्टी यांनी केला. (प्रतिनिधी)

भाई पंजाबराव पाटील यांनी अगोदरच
घेतला जामीन
न्यायालयाने चौघांच्या विरोधात वॉरंट काढल्यानंतर ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतंत्ररीत्या न्यायालयात येऊन जामीन घेतला आहे. ते आता वेगळ्या संघटनेत काम करत असल्याने त्यांनी आजच्या सुनावणी अगोदरच जामीन घेतला आहे.

Web Title: 'Swabhimani' leaders appear in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.