तार्इंच्या प्रवेशावर ‘स्वाभिमानी’गप्प
By Admin | Updated: July 27, 2014 23:03 IST2014-07-27T22:29:54+5:302014-07-27T23:03:45+5:30
दुसऱ्या हप्त्याची लढाई तीव्र करणार : आॅगस्टमध्ये ठरणार रणनीती

तार्इंच्या प्रवेशावर ‘स्वाभिमानी’गप्प
सातारा : माजी आमदार शालिनीताई पाटील यांचा पक्षप्रवेश आणि कोरेगावातून उमेदवारी यावर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बोलणे टाळले. दरम्यान, दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा म्हणून आम्ही तीव्र आंदोलन उभे करणार असून, आॅगस्टमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यात पुढील रणनीती स्पष्ट करणार असल्याची माहिती संजय भगत, मनोज घोरपडे यांनी दिली.
शालिनीताई पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश द्यावा आणि कोरेगावातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जरंडेश्वर कारखाना गटाच्या काही कार्यकर्त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्याचाच संदर्भ देत पत्रकारांनी भगत आणि घोरपडे यांना छेडले असता त्यांनी या विषयावर थेट बोलणे टाळले. स्वाभिमानीचा उमेदवार कोण राहील, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार असला तरी कार्यकर्ते म्हणून या मतदारसंघातून निष्कलंक आणि सहकार वाचविणाऱ्या उमेदवाराच आमचे प्राधान्य राहील, असे सांगण्यासही भगत आणि घोरपडे विसरले नाहीत.
दरम्यान, दुसऱ्या हप्त्याची लढाई स्वाभिमानीने आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भगत म्हणाले, ‘दि. २ आॅगस्ट रोजी कोरेगाव आणि उंब्रज येथे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसऱ्या हप्त्याच्या लढाईची अंतिम घोषणा होणार आहे. जरंडेश्वर शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा आणि दुष्काळी भागासाठी आवश्यक असणारे; मात्र रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, महाराष्ट्रात दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.’ यावेळी सुर्यकांत भुजबळ, शंकर शिंदे, संजय साबळे, अल्लाउद्दीन इनामदार, हणमंत जगदाळे, संभाजी केंजळे, जीवन शिर्के, उपस्थित होते. (प्रतिनिधी)