सूर्याला खळे... पाऊस पळे !
By Admin | Updated: August 18, 2015 22:37 IST2015-08-18T22:37:43+5:302015-08-18T22:37:43+5:30
साताऱ्यात तेजोवलयाचे दर्शन : नोव्हेंबर-डिसेंबरपासून पुन्हा गारपिटीची चिन्हे; अवकाळी सरीही शक्य--लोकमत विशेष...

सूर्याला खळे... पाऊस पळे !
राजीव मुळ्ये ल्ल सातारा सूर्याभोवती इंद्रधनुष्याप्रमाणे रंगबिरंगी; परंतु पूर्ण वर्तुळाकृती तेजोवलयाचे दर्शन सातारकरांना मंगळवारी घडले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यापुढे पावसाचे प्रमाण कमी होत जाईल असे संकेत या घटनेने दिले असून, नोव्हेंबर-डिसेंबरपासून राज्यात पुन्हा गारपीट सुरू होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन- तीन वर्षांतील निरीक्षणे अशीच आहेत. सूर्यावरील हालचाली आणि हवामानबदलांच्या परिणामांमुळे गारपिटीची चिन्हे असल्याचे भाकित ‘लोकमत’ने गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये वर्तविले होते आणि तीनच दिवसांत गारपीट सुरू झाली होती. सूर्याभोवती मंगळवारी दिसलेले खळे हा याच बदलांचा परिणाम असून, विशिष्ट प्रकारच्या ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यकिरण आरपार गेल्यामुळे हे रंगबिरंगी खळे अनुभवायला मिळाले. अशा प्रकारचे ढग पावसाळा संपत आल्याचे निदर्शक मानले जातात. दरम्यान, सोमवारी सांगलीकरांनाही सूर्याला खळे पडल्याचे दिसून आले होते. सूर्यावरील घडामोडी आणि त्यांचे वातावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ खळ्याचा संबंध पावसाचे प्रमाण, अनियमितता आणि गारपिटीशी जोडतात. गेल्या दोन-तीन वर्षांत जेव्हा असे खळे दिसले, तेव्हा मुख्य पावसाळ्यातील पाऊस कमी होऊन अवकाळी पावसाच्या आणि गारपिटीच्या घटना वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात लातूर, नांदेड भागात सूर्याभोवती खळे पहिल्यांदा दिसले. त्यानंतर २५ जुलैला याच भागात ते पुन्हा दिसले. सोमवारी सांगलीत आणि मंगळवारी साताऱ्यात दिसले. ढगाळ वातावरण असल्याने सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी हे तेजोवलय पाहिले. समुद्रसपाटीपासून खूप उंच असणाऱ्या हिमालयाच्या रांगांमध्ये ढग जवळ असतात. त्यामुळे तेथे असे वलय नेहमी दिसते. मात्र, तुलनेने खूपच कमी उंचीवर असलेल्या महाराष्ट्रात हे वलय दिसण्याची घटना दुर्मिळ आहे. ‘आयटीसीझेड’ पट्टाउत्तरेकडे... सूर्यावर होणाऱ्या स्फोटांची संख्या वाढत जाते आणि नंतर पुन्हा ती कमी होत जाते. हे चक्र अकरा वर्षांचे असते. सध्या हे स्फोट कमी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे ‘इंटर ट्रॉपिकल क्लायमेट झोन’ म्हणजेच ‘आयटीसीझेड’ हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळेच उत्तर भारतात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनपेक्षित मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण होत आहे, तर याच काळात दक्षिण भारतातील पावसाळ्याचे दिवस कमी होऊन अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या घटना वाढत आहेत. तांबूस रंगाचे वलय साताऱ्यातून दिसलेले तेजोवलय सूर्यापासून थोडे दूर होते. वर्तुळाच्या आतील बाजूला ते तांबूस रंगाचे होते, तर बाहेरील बाजूने हिरवट निळ्या रंगाचे होते. सुमारे दीड तास हे वलय दिसत होते. इंग्रजीत या वलयाला ‘हालो’ असे म्हणतात. दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान हे वलय दिसले. सूर्याभोवती पडलेले खळे ‘सायरस’ प्रकारचे ढग असतील तरच दिसते. हे ढग पावसाळा संपत आल्याचे निदर्शक असून, यापुढील काळात पाऊस कमी होत जाईल, तर नोव्हेंबर, डिसेंबरपासून गारपीट किंवा अवकाळी पाऊस पडेल, अशी दाट शक्यता आहे. - श्रीनिवास औंधकर, खगोलतज्ज्ञ, महात्मा गांधी मिशन महाविद्यालय, नांदेड