कºहाडात वाहने, दुकानांवर दगडफेक
By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:13:29+5:302014-06-03T01:24:49+5:30
जमाव आक्रमक : पोलीस बंदोबस्त तैनात, रात्री उशिरापर्र्यत शहरात तणाव

कºहाडात वाहने, दुकानांवर दगडफेक
कºहाड : सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रार्थनास्थळाचे आक्षेपार्ह फोटो व मजकूर टाकण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यामुळे आज, सोमवारी दुपारपासून शहरात तणाव निर्माण झाला. जमावाने पोलीस ठाण्यावर चाल केली, तसेच तुफान दगडफेक करीत दुकाने व वाहनांच्या काचा फोडल्या. रात्री उशिरापर्यंत शहरात प्रचंड तणाव होता. परिस्थिती चिघळल्याने बाहेरील पोलीस बंदोबस्त शहरात मागविण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर धार्मिक भावना प्रक्षुब्ध करण्यासाठी दुसर्यांदा करण्यात आला. दरम्यान, यावेळी आक्षेपार्ह फोटो व मजकूर पोस्ट करणारा युवक कºहाडातीलच असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या युवकाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आक्षेपार्ह फोटो व मजकूर आज सोशल मीडियावर टाकण्यात आला. ते फोटो व मजकूर मोबाईलद्वारे सर्वत्र पसरल्यानंतर दुपारपासून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त झालेला जमाव सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गेला. संबंधित फोटो व मजकूर टाकणार्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जमावाने केली. संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जमाव पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच काही संतप्त युवकांनी दुचाकीवरूनच मुख्य बाजारपेठ मार्गावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. दुकाने, एटीएम सेंटर तसेच वाहनांनाही युवकांनी लक्ष्य केले. बाजारपेठेनंतर जमाव बसस्थानकमार्गे दत्त चौकातून तहसील कार्यालयाकडे व तेथून मलकापूरकडे गेला. मलकापूर येथे महामार्गावरून जाणार्या तसेच उपमार्गाकडेला उभ्या केलेल्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. एका बीअर बारसह अन्य काही दुकानांच्या काचाही जमावाने फोडल्या. शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, निरीक्षक नितीन जगताप यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्वरित रवाना झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी बाहेरून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती.