राज्यातील साखर उद्योग सर्व बाजूंनी अडचणीत

By Admin | Updated: November 1, 2015 23:47 IST2015-11-01T23:47:53+5:302015-11-01T23:47:53+5:30

हर्षवर्धन पाटील : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामास प्रारंभ

The state's sugar industry is facing trouble all over | राज्यातील साखर उद्योग सर्व बाजूंनी अडचणीत

राज्यातील साखर उद्योग सर्व बाजूंनी अडचणीत

भुर्इंज : यंदा राज्यातील साखर उद्योग सर्व बाजंूनी अडचणीत सापडला आहे. निसर्ग कोपलेला आहे, दुष्काळाचे प्रचंड सावट राज्यावर आहे. राज्याच्या सर्व धरणांमधील पाणी आटले आहे. पाण्याचे वाद सुरू झालेले आहेत. या सर्व अडचणींतून कसा मार्ग काढायचा हा साखर कारखानदारांसमोर मोठा प्रश्न आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत काडसिद्धेश्वर स्वामींचा आशीर्वाद साखर उद्योगाला आधार ठरावा,’ अशी सदिच्छा माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळित हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान, कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, डॉ. नीलिमा भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रल्हादराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
साखर उद्योग बंद पडला तर पुन्हा सुरू होईल की नाही, सांगता येत नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारी उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘राज्याच्या विविध धरणांमध्ये सुमारे एक लाख सत्त्याहत्तर हजार घनमीटर पाणी अडविण्यात येते. धरणांसह नदी, नाले, विहिरींमधील नव्वद टक्के पाणी हे ऊस पिकासाठी लागते. हा नवा जावईशोध जलतज्ज्ञांनी लावला आहे, हे दुर्दैवी आहे. राज्यात पस्तीस लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या वाचाळविरांनी आता चर्चा थांबवावी आणि एकदाच ऊस पाण्याबाबतचे निश्चित धोरण ठरवावे. गेल्या हंगामात नऊशे पस्तीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन शंभर लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र बाजारात घसरलेल्या साखरेच्या दरामुळे साखर उद्योगाला दहा हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला. साखर धंद्यातून केंद्र व राज्य सरकारला तीन ते पाच हजार कोटी दरवर्षी कररूपाने मिळतात; मात्र सरकारने म्हणावी तशी व योग्य वेळी मदत केली नाही. यंदाच्या हंगामात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार अतिशय चिंतेत आहेत. त्यांचा धीर सुटू लागला आहे.’
प्रास्ताविकात मदन भोसले म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीतून जात असतानाही केवळ साखर उत्पादनावर न थांबता अनेक पूरक उद्योग उभारल्यामुळेच शेतकऱ्यांना विनाकपात एकरकमी एफआरपी देऊ शकलो. साखर उत्पादन खर्च व साखरेच्या दरात एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतची तफावत असतानाही शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यात सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कमी पडलो नाही. यंदाच्या हंगामातही अनेक अडचणी आहेत. मात्र एकरकमी एफआरपी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
यावेळी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. दत्तात्रय शेवते व विकास कदम यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: The state's sugar industry is facing trouble all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.