राजकारणापायी राज्याला वेठीस धरू नये : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:05+5:302021-04-25T04:39:05+5:30

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले ...

The state should not be held hostage by politics: Prithviraj Chavan | राजकारणापायी राज्याला वेठीस धरू नये : पृथ्वीराज चव्हाण

राजकारणापायी राज्याला वेठीस धरू नये : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता होती. तज्ज्ञ सांगत होते. मात्र केंद्र सरकार कुंभमेळा, निवडणुका यामध्येच गुंतलेले होते, केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी राजकारण आणत आहे. आता हातघाईवर आलेल्या परिस्थितीमध्ये केंद्राने राज्य सरकारला वेठीस धरू नये, असा इशारा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येईल, याचा अंदाज होता. या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांचे उत्पादन केंद्र सरकारने वाढवायला पाहिजे होते. देशाचे नेते यांची सर्व जबाबदारी आहे. केंद्र सरकारने गोंधळलेल्या अवस्थेत लसीकरणाचा निर्णय घेतला गेला. तज्ञ सांगत होते. निर्णय घेण्याची क्षमता असूनही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे जनतेला त्रास झाला. सरकारची यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे. लोकांचे प्राण नाहक चालू आहेत, केंद्राची ही सर्व जबाबदारी आहे.

विरोधी पक्षाने टीका केली तर गैर नाही. जे प्रकार पुढे येत आहेत. खासगी व्यक्तीने रेमडेसिविरचा साठा केला, लसींचा साठा केला, हे खरे आहे. कितीही उच्च पदस्थ असला तर मोठ्या जबाबदार पदावर बसणाऱ्यावर कारवाई का होऊ नये.

काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड मदत केंद्र सुरू केले. प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून संपूर्ण राज्यात मदत करत आहोत. आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारलाच ऑक्सिजन, रेमडेसिविरप्रमाणे केंद्रातून लसींचा साठा आला नाही तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत पडण्याची भीती आहे. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा केला असावा म्हणूनच तर मोठा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाप्रमाणे लसी मिळाल्या नाहीत तर अवघड परिस्थिती ओढवेल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये सुरू केलेल्या कोरोना मदत केंद्राचे उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. (छाया : जावेद खान)

Web Title: The state should not be held hostage by politics: Prithviraj Chavan