राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST2021-03-08T04:37:04+5:302021-03-08T04:37:04+5:30
सातारा : ‘कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार वादविवादात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम ...

राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही
सातारा : ‘कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार वादविवादात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा राज्यात येईल,’ असा दावाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. या वेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा दौऱ्यावर आल्यानंतर मंत्री आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री आठवले म्हणाले, शेतकऱ्यांबद्दल आम्हाला प्रेम आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र शासनाचीही आहे. केंद्राने कृषीविषयक केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर दुसरे कायदे मागे घ्या म्हणून मागणी होऊ शकते. त्यामुळे संसदेलाच काहीही अर्थ राहणार नाही. आताचे कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी करावी.
राज्यातील सत्तेत शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवे होते. मात्र, शिवसेनेची भूमिका अडवणुकीची राहिली. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा एक कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी.
चौकट :
राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल...
राज्यात कोरोनाची स्थिती वाढलेली आहे. नागरिकांवर कारवाई होते. अशा वेळी मनसे नेते राज ठाकरे हे विनामास्क जातात याबद्दल आपले मत काय, असा प्रश्न मंत्री आठवलेंना पत्रकारांनी केला. यावर आठवले म्हणाले, मास्क नसेल तर नेत्यांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. राज ठाकरे हेही नेते आहेत. कदाचित त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश मानायचा नसेल म्हणून ते मास्क वापरत नसतील. पण, त्यांचा त्रास कोणाला होऊ नये, असे वाटते.
.................
आघाडीचे २७, २८ आमदार फुटतील...
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे भाजपचे नेते राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे मध्यावधी निवडणूक होणार का, असा प्रश्न केल्यावर मंत्री रामदास आठवले म्हणाले, मध्यावधी निवडणूक कोणाला नको आहे. पण, भाजपकडे महाविकास आघाडीतील २७ ते २८ आमदार फुटून येतील. सध्या आमच्याकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते.