केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ
By Admin | Updated: November 16, 2015 23:59 IST2015-11-16T23:18:55+5:302015-11-16T23:59:45+5:30
विखे-पाटलांचा आरोप : पूर्णवेळ कृषिमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना गृहखाते सोडवेना

केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ
कऱ्हाड : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसत आहेच; पण राज्यातील सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनभिज्ञ दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, ही बाब गंभीर असून, सरकारने आपले दायित्व निभावण्याची गरज आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडला आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, राजू शिंदे, अविनाश नलवडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत केले.
विखे-पाटील म्हणाले, ‘तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तरीही सरकारला अजूनही जाग आलेली दिसत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, तसेच गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर सिटी क्राईम कॅपिटल झाली तरी गृहखाते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हे सारे प्रश्न कसे मार्गी लागणार हा गहण मुद्दा आहे. राज्यातील सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही कोण्या एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली योजना शासन राबवत आहे. अमूक-तमूक टीएमसी पाणीसाठा वाढला, असे तुणतुणे वाजविण्यातच सरकार मश्गुल आहे. परंतु ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे.
मुंबईतील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला आपणाला का डावलण्यात आले, कार्यक्रम सरकारचा होता की एका पक्षाचा, याबाबत छेडले असता जे लोक सत्तेतील शिवसेनेलाच बाजूला ठेवतात. तिथे आमचा विषय दूरच; परंतु असे केले तरी आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल, अशी त्यांची भावना चुकीची आहे. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची पोेचपावती आहे. त्यामुळे यातून तरी हे सरकार काही धडा घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’ (प्रतिनिधी)
नगराध्यक्षांचे निवेदन
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना कऱ्हाडच्या नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे यांनी एक निवेदन दिले. ते हातात घेताच विखे-पाटील यांनी हे काय आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी नगरसेवकांना असहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव करून दोन महिने उलटले तरी प्रशासन लक्ष घालत नसल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. आपण यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी करताच मी पृथ्वीराज चहाण यांच्याशी बोलून काय करायचे ते ठरवतो, असे उत्तर त्यांनी दिले. ं