प्लास्टिकयुक्त रस्त्याच्या कामास प्रारंभ
By Admin | Updated: June 22, 2016 00:08 IST2016-06-21T22:22:06+5:302016-06-22T00:08:23+5:30
किसन वीर कारखाना : देखभालीसह दुरुस्तीचा खर्च वाचणार

प्लास्टिकयुक्त रस्त्याच्या कामास प्रारंभ
भुर्इंज : ‘राज्य शासनाने नुकताच एका शासन निर्णयाद्वारे विघटन होत नसलेल्या आणि पर्यावरण व स्वच्छतेला घातक ठरणाऱ्या टाकाऊ प्लास्टिकचा वापर राज्यातील रस्ते डांबरीकरणाच्या कामासाठी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. या निर्णयापूर्वीच किसन वीर कारखाना कार्यस्थळावर प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिकयुक्त रस्ता ‘प्लास्टिक टार रोड’ या तंत्रज्ञानातून प्रत्यक्षात साकारला आहे,’ असे मत या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सलटंन्सीचे (जीएमजीसी) संचालक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले.
कारखाना कार्यस्थळावर साकारलेल्या प्लास्टिक रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी हिंगमिरे आले होते.
ते म्हणाले, ‘घनकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि रॅपर्स यांचे विघटन होत नसल्यामुळे ती एक राष्ट्रीय समस्या निर्माण झालेली आहे. प्लास्टिक टार रोडच्या माध्यमातून त्याच्या निर्मूलनासाठी जीएमजीसीने केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडे सादरीकरण, पाठपुरावा करून पेटंट व परवाना दोन वर्षांपूर्वीच मिळविलेला आहे. राज्य सरकारने प्लास्टिकयुक्त रस्त्याचा आता निर्णय घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; पण दाद द्यावी लागेल, ती किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या दूरदृष्टीला आणि त्यांनी अशा प्रकारचा रस्ता करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला. शासनाने प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पर्यावरण व आरोग्याला घातक ठरणाऱ्या टाकाऊ प्लास्टिकच्या विल्हेवाटीला आणि शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला गती मिळणार आहे. डांबरी रस्त्यात प्लास्टिकचा वापर होणार असल्यामुळे डांबर आयातीचे प्रमाण घटून देशाच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. आज शासनाला किमान तीन हजार सहाशे कोटी रुपये राज्यातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावे लागतात. प्लास्टिकयुक्त रस्ते मजबूत, टिकाऊ व किमान दहा वर्षांपर्यंत खराब होणार नसल्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. (प्रतिनिधी )
संस्थांनी पुढे
येण्याची गरज...
राज्य शासनाने महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या डांबरीकरणात टाकाऊ प्लास्टिकचा वापर सक्तीचा केला आहे. असे असले तरी, प्लास्टिकयुक्त रस्त्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतलेल्या किसन वीर साखर कारखान्यासारख्या संस्थांनी आपल्या परिसरात अशा प्रकारचे प्लास्टिकयुक्त रस्ते करण्यासाठी पुढे येऊन देश-राज्य प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सरसावले पाहिजे, अशी अपेक्षाही हिंगमिरे यांनी व्यक्त केली.