एसटी रोज करावी लागतेय बंद-चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST2021-06-02T04:28:48+5:302021-06-02T04:28:48+5:30

सातारा : कोणत्याही वस्तूचा नियमित वापर होत नसल्यास गंज चढतो, पुढे काम करणे बंद होते, हा आपल्याला नेहमीच येत ...

ST has to be done daily on-off | एसटी रोज करावी लागतेय बंद-चालू

एसटी रोज करावी लागतेय बंद-चालू

सातारा : कोणत्याही वस्तूचा नियमित वापर होत नसल्यास गंज चढतो, पुढे काम करणे बंद होते, हा आपल्याला नेहमीच येत असलेला अनुभव आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तर गेल्या वर्षी सात महिने अन् आता सुमारे एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे या गाड्यांची काय अवस्था होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र हेच नुकसान टाळण्यासाठी कामगार प्रत्येक गाडी दररोज चालू करून बंद करत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. तेव्हा कोरोनाचा आणखी संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑगस्टनंतर कोरोनाची साथ कमी होऊ लागल्यानंतर एसटी सुरू झाली. पण या काळात जवळपास सात महिने सर्व गाड्या एकाच ठिकाणी होत्या. त्याचप्रमाणे पुन्हा या वर्षी गेल्या महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका एसटीला बसला.

गाड्या एकाच ठिकाणी असल्याने नुकसान होऊ नये म्हणून विभागीय कार्यशाळा तसेच आगारातील कारागीर ठराविक संख्येने कर्तव्यावर येत आहेत. ही मंडळी कामावर आल्यावर एकानंतर एक गाड्या सुरू करून आतमध्येच एखादी चक्कर मारून आणत असतात. तसेच राहिलेली कामे करत असतात. वेळ पडलीच तर काही गाड्यांच्या बॅटऱ्या मात्र सोडवून बाजूला केल्या जातात. त्यामुळे नुकसान टळले जाते.

११

जिल्ह्यातील आगार

७५०

एकूण बससंख्या

वर्षातून तीन महिने रस्त्यावर

n गेल्या वर्षी २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद होती. ती सर्वसाधारणपणे दसऱ्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. त्यामुळे या वर्षात केवळ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत फेऱ्या सुरू होत्या.

n गाड्या एकाच जागी उभ्या असल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेतन करण्याएवढेही उत्पन्न नव्हते.

काळजीमुळे

खर्च कमी

n राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यशाळा तसेच आगारातील कर्मचारी वाहनांची वेळीच काळजी घेत आहेत.

n लहानमोठा बिघाड असल्यास तो तत्काळ दुरुस्त केला जात असल्याने यानंतर रस्त्यावर आणण्यास फारसा खर्च येणार नाही.

लाॅकडाऊन असले तरी ठराविक संख्येने कर्मचारी येत असतात. ते वाहनांची देखभाल दररोज पाहतात. त्यांच्या कामाचे वार्षिक नियोजन तयार असते. त्यानुसार ते ते कामे सुरू आहेत. सध्या पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत.

- संजय भोसले, प्रभारी, यंत्र अभियंता चालन

कोट्यवधीचे नुकसान

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात अकरा आगार आहेत. यातील सर्वच आगारांतून चांगली वाहतूक केली जाते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लाॅकडाऊनमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे कधीच भरून निघणारे नाही.

Web Title: ST has to be done daily on-off