मंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांच्या व्यथा!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 00:58 IST2016-05-29T22:50:10+5:302016-05-30T00:58:34+5:30

कऱ्हाड उत्तर मतदारसंघ : विद्या ठाकूर यांनी साधला संवाद; धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना पूर्ण करण्याची मागणी

Soreness of drought-hit people before ministers! | मंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांच्या व्यथा!..

मंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांच्या व्यथा!..

मसूर : कऱ्हाड उत्तर मतदार संघाच्या पूर्व भागातील दहा गावांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या दुष्काळी दौऱ्यात गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी, शेती, वीज व रस्ते यासह दुष्काळी भीषणता पोटतिडकीने मांडली. याशिवाय या भागाचा दुष्काळ संपविण्यासाठी धनगरवाडी-हणबवाडी ही रखडलेली पाणी योजना तत्काळ पूर्णत्वास नेण्याची एकमुखी जोरदार मागणी केली.
दरम्यान, ‘या दुष्काळी सर्वच गावांच्या प्रमुख मागण्या व समस्यांचा अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. याबद्दल सकारात्मक पाठपुरावा करणार आहे,’ असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी दुष्काळी जनतेस दिला.
कऱ्हाड पूर्व भागातील मसूर, किवळ, खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, पाडळी, गोसावेवाडी या भागाचा दौरा मंत्री ठाकूर यांनी केला.
यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे, तालुका कृषी अधिकारी खरात, आरफळ कालव्याचे शाखा अभियंता नांगरे, लघू पाटबंधारे विभागाचे सुरवसे, भाजपचे विक्रम पावस्कर, रामकृष्ण वेताळ, विश्वास सावंत, कऱ्हाड उत्तर दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद कुंभार, सदस्य सूर्यकांत पडवळ, प्रशांत देशमुख, छाया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री ठाकूर म्हणाल्या, ‘राज्यात दुष्काळाची तीव्रता आहे. त्यासाठी शासनाने दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजनांसाठी दुष्काळी दौरे आयोजित केले आहेत. कऱ्हाड उत्तर पूर्व भागाला दुष्काळाचे चटके बसत आहेत.
येथे पिण्याचे व शेतीच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे. यासाठी या दुष्काळी दौऱ्यात शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही. अधिकारी वर्ग विविध शासकीय योजनांचा लाभ देतात की नाही.
दिलेल्या निधीचा योग्य वापर होतो का यासह दुष्काळी भागतील गावांच्या नेमक्या काय समस्या
आहेत. तेथे काय करणे गरजेचे आहे. यासाठी या दुष्काळी पाहणी
दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Soreness of drought-hit people before ministers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.