छोट्या पक्षांना मोठ्या भूमिकेची संधी
By Admin | Updated: September 28, 2014 00:34 IST2014-09-28T00:32:16+5:302014-09-28T00:34:44+5:30
वजन वाढणार की घटणार? : भविष्यातील राजकीय स्थान ठरविणारी निवडणूक पाहणार सत्त्वपरीक्षा

छोट्या पक्षांना मोठ्या भूमिकेची संधी
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
ऊस दरवाढ, दूध दरवाढीचा प्रश्न हाताळत रस्त्यावरील आंदोलने करणारी, गनिमी कावा करत पोलिसांना सळो की पळो करून सोडण्यात प्रसिद्ध असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाडा गाजविण्याच्या तयारीत आहे. स्वाभिमानीने जिल्ह्यातील तीन मतदारसघांत उमेदवार देण्याची तयारी केली आहे.
शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेतून बळीराजाचे प्रश्न हाताळण्यासाठी तरुण एकत्र आले. त्यातील शंकर गोडसे यांनी जिल्ह्यात संघटना वाढविण्याचे काम केले. शरद जोशी राज्यसभेवर गेल्यानंतर संघटनेत फूट पडली. राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. रघुनाथदादा पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघ आणि शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना वेगवेगळ्या मार्गाने काम करत होते. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये ऊसदरवाढीसाठी मोठे आंदोलन झाले. दूध दरवाढीसाठी गनिमी काव्याने आंदोलने केली. ‘स्वाभिमानी’च्या आक्रमकपणामुळे शेतकरी संघटनेकडे आकर्षिले गेले आणि २००९ मध्ये राजू शेट्टी हातकणंगलेतून खासदार झाले.
यशवंत सेना ते रासप... एक खडतर प्रवास
नितीन काळेल ल्ल सातारा
सुमारे २५ वर्षांपूर्वी अभियंत्याची पदवी हातात असतानाही समाजजागृतीसाठी फाटक्या खिशाने बाहेर पडलेल्या माणदेशी माणसाने आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लक्षवेधी झेप घेतली आहे. यशवंत सेना ते रासप असा प्रवास करणाऱ्या महादेव जानकर यांच्या पक्षावर सुरुवातीला विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून शिक्का मारण्यात येत होता. तोच ‘रासप’ आज सर्वजनवादी ठरला आहे.
१९८८ ला धुळदेव (ता. फलटण) येथे पुणे जिल्ह्यातील बी. के. कोकरे यांनी धनगर समाजाच्या जागृतीसाठी यशवंत सेनेची स्थापना करून दोन वर्षे संपूर्ण राज्यात रान उठविले. त्यामुळेच शरद पवार यांना धनगर समाजाचा ओबीसीतून एनटीत (भटकी जमात) समावेश करावा लागला. त्यानंतर राजकीय खेळी व दबावातून १९९१ ला यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन झाली. यशवंत सेना संपली असे सर्वांनाच वाटले. पण, १९९२ ला माण तालुक्यातील पळसावडे येथील महादेव जानकर यांनी यशवंत सेना पुनरुज्जीवित करण्याचा विडा उचलला. लोकवर्गणीतून संघटना चालवीत असतानाच १९९३ ला म्हसवड येथे मेळावा घेऊन धनगर समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याची व घरी न जाण्याची शपथ घेतली. ती आजही पाळली आहे. त्यानंतर जानकर यांनी बसापचे तत्कालीन अध्यक्ष कांशीराम, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, इतिहास संशोधक मा. म. देशमुख यांच्याबरोबर महाराष्ट्र तसेच राज्यांतील धनगर व बहुजन समाजाचा अभ्यास, प्रबोधन व संघटन केले.
१९९५ च्या सुमारास मराठवाडा हा यशवंत सेनेचा केंद्रबिंदू होता. ‘एक लेकरू, एक कोकरू’ अशी घोषणा देऊन मराठवाडा पिंजून काढला. त्याच वेळी यशवंत सेना बसपाशी संलग्न होती. १९९८ ला बसपाच्या तिकिटावर जानकर यांनी नांदेडमधून भास्करराव पाटील-खतगावकर यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दखल घेण्याइतपत मते मिळविली.
दि. ३१ मे २००३ ला नगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. २९ सप्टेंबर २००३ ला निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात अनेक जागा लढविल्या. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघात ‘रासप’चा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. माणमधील उमेदवाराने २५ हजार मते घेतली होती. २००७ च्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून पक्षाचा पहिला पंचायत समिती सदस्य निवडून आला. २००९ मध्ये राज्यात ‘रिडालोस’च्या स्थापनेत जानकर यांचा मोठा वाटा होता. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने पक्षाचा पहिला आमदार निवडून आला. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत परभणी व बीड जिल्ह्यातून ‘रासप’चा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे व जानकर यांची युती झाली होती. तेव्हा जानकर ‘एनडीए’त जाणार याची नांदी सुरु झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत ‘रासप’ महायुतीत समाविष्ट झाला. त्यानंतर जानकर यांनी बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून ४ लाख ५१ हजार मते घेतली. पण, अवघ्या ६९ हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. या लढतीची दखल राष्ट्रीय पातळीपर्यंत घेतली गेली.