औंधसह सोळा गावे आक्रमक

By Admin | Updated: July 28, 2014 22:59 IST2014-07-28T22:59:58+5:302014-07-28T22:59:58+5:30

पाणीप्रश्न : गोरे यांच्या निवासस्थानी करणार उपोषण

Sixteen villages with Aunda aggressive | औंधसह सोळा गावे आक्रमक

औंधसह सोळा गावे आक्रमक

सातारा : औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी दि. ५ आॅगस्टपासून माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय राजवैभव प्रतिष्ठानने घेतला आहे.
औंधसह सोळा गावांची कोअर कमिटीची बैठक औंध येथील दत्त मंदिरात झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.
मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री सातारा जिल्ह्यातील असतानाही औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊनही जर शासकीय बैठक होत नसेल तर ते गंभीर आहे. सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींनी शेतीचे पाणी पळविले. तरीही दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांकडे पाहण्यासाठी राजकीय मंडळींना वेळ नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. काही. लोकप्रतिनिधी औंधसह सोळा गावांना ब्रह्मपुरी योजनेचे पाणी देणार असल्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ही योजना फक्त चारमाही आहे. त्यामुळे उर्वरित आठ महिन्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा आक्षेपही यावेळी घेण्यात आला.
सोळशी धरणात खटाव तालुक्याचा समावेश होत नाही. त्यामुळे औंधसह सोळा गावांना उरमोडी योजनेतून १.०९ टीएमसी पाणी ठिबक सिंचनद्वारे देता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी माण आणि खटाव तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ही बैठक दि. ४ आॅगस्टपूर्वी नाही झाली तर सोळा गावांतील प्रमुख १६० प्रतिनिधी या आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.’
यावेळी दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ घार्गे, प्रा. रामचंद्र साळुंखे, जयवंत खराडे, नवल थोरात, शशिकांत जाधव, प्रभाकर देशमुख, जितेंद्र फडतरे, सुनील सूर्यवंशी, पृथ्वीराज भोकरे, जालिंदर राऊत, श्रीमंत देशमुख, जयसिंग घार्गे, महादेव देशमुख, हंबीरराव देशमुख, अर्जून देशमुख, भानुदास माळी, भिकू पवार, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मीही उपोषणात सहभागी : गोरे
औंधसह सोळा गावे माझ्या निवासस्थानी उपोषणास बसणार आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासमवेत मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. माझ्या निवासस्थानी उपोषण करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून आ. गोरे म्हणाले, ‘औंधसह सोळा गावांच्या पाणी प्रश्नासाठी मी भांडतोय की नाही, हे त्यांनीच ठरवावे. त्यांच्या पाणीप्रश्नांच्या अनुषंगाने त्यांना राज्यपालांची भेट कोणी घडवून आणली, याचा इतिहास त्यांनी तपासून पाहावा. कोणतीही गोष्ट तत्काळ होत नसते. काही गोष्टींना विचाराअंतीच सामोरे जायचे असते. ही बाब त्यांना समजत नसेल तर त्याला मी तरी काय करणार. ज्यांच्या दारात त्यांना उपोषण करावयाचे आहे, तेथे ते उपोषण करत नाहीत. ते माझ्याच निवासस्थानी बसत असतील तर मीही त्यांच्यासोबत आनंदाने उपोषण करण्यास तयार आहे.’

Web Title: Sixteen villages with Aunda aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.