सहा तरुणी, एक युवक बेपत्ता
By Admin | Updated: December 9, 2014 00:34 IST2014-12-08T22:37:07+5:302014-12-09T00:34:30+5:30
पोलीस तपास सुरू : सातारा, वाई तालुक्यातील घटना

सहा तरुणी, एक युवक बेपत्ता
सातारा / वाई : वाई तालुक्यातून दोन युवती, एक युवक आणि सातारा तालुक्यातून चार युवतींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा तालुक्यातून एकाच दिवशी चार मुली गायब झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात झाल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अशी माहिती की, कोंडवे येथून नेहा हिचे अपहरण झाल्याची तक्रार तिचे वडील संपत यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नेहा हिला दि. १७ नोव्हेबंर रोजी राहत्या घरातून कोणीतरी पळवून नेले. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार कांबळे करत आहेत.
आटाळी येथून अंकिता आणि सोनाली या दोन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार निर्मला यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडल्याची माहितीही निर्मल यांनी म्हटले आहे. याचा तपास हवालदार बोरसे करत आहेत.
वनगळ येथून दि. १२ नोव्हेंबर रोजी मोनिका हिला राहत्या घरी असताना कोणीतरी फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिची आई रुक्मिणी यांनी दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास हवालदार विलास मराडे करत आहेत.
दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकाच दिवशी चार घटनांची नोंद झाल्यामुळे पोलीसही चक्रावले असून परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
वाई : येथून दोन अल्पवयीन मुली तर एका महाविद्यालयीन युवकांचे अपहरण झाल्यची तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कणूर, ता़ वाई येथील बाळकृष्ण काटे (वय १७) हा युवक रविवार, दि. ७ रोजी सकाळी कॉलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडला.
मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तो घरी न आल्यामुळे त्याच्या आई-वडिलानी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहाबाग येथील सतरा वर्षीय मुलगी शाळेत जाते म्हणून सांगून गेली ती घरी परतलीच नाही. तिला अभिषेक गाढवे (वय २२, रा. फुलेनगर, वाई) याने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली आहे.
दरम्यान, वाई परिसरातील फुलेनगर येथे आणखी एक घटना घडली असून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला शिवा लक्ष्मण गौडमुरे (रा. दक्षिण सोलापूर) याने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे. दरम्यान, तक्रारदार महिला मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.
या घटनेनंतर संबंधितांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता त्याचा कोठेही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक पी. एन. खरात आणि हवालदार जी. एस. भोईटे करत आहेत. (प्रतिनिधी)
बाळकृष्ण ज्या दिवशी निघून गेला त्याचदिवशी सांयकाळी सात वाजता सातारा बसस्थानकातील एका पीसीओवरून बाळकृष्ण काटे याच्या वडिलांना फोन आला आणि ‘मी आप्पा बोलत आहे’, असे सांगून कोणीतरी अज्ञातानी फोन कट केला. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. हा युवक गेले पंधरा दिवस महाविद्यालयात गेलाच नसल्याचे महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर समजले.