शिवशाही गाड्या पुन्हा सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST2021-09-06T04:42:49+5:302021-09-06T04:42:49+5:30
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आलिशान शिवशाही गाड्यांना मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. तसेच त्यांचे दरही जास्त असल्याने सर्वसामान्य ...

शिवशाही गाड्या पुन्हा सुसाट
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आलिशान शिवशाही गाड्यांना मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. तसेच त्यांचे दरही जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमधून लालपरीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. तरीही शिवशाही गाड्यांना सातारा विभागातून किंचित ‘ब्रेक’ लागला आहे. जिल्ह्यात केवळ २१ शिवशाही धावत आहेत. इतर दोन गाड्या आगारातच उभ्या आहेत.
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मार्च २०२०पासून सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. त्यातही सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.ला बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी जीव तोडून काम करत आहेत. दरम्यानच्या काळात उत्पन्न वाढीसाठी माल वाहतूकही सुरू करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर एस. टी.च्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या. पण अनेकांचे रोजगार गेले आहेत. या काेरोना काळात उद्योगधंद्यांवर परिणाम अनुभवले आहेत. त्यामुळे हौस म्हणून फिरायला जाण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचा परिणाम एस. टी.च्या फेऱ्यांवरही जाणवत आहे. म्हणूनच साध्या दरातील गाड्यांनीच प्रवास करण्याला प्रवाशांमधून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
चौकट :
डिझेलचाही वाढतोय वापर
शिवशाही गाड्या वातानुकूलित आणि फुल्ली संगणकीय आहेत. त्यामुळे या गाड्या बसस्थानकात काही वेळेसाठी उभ्या राहिल्या तरी बंद करुन चालत नाहीत. त्या सुरूच ठेवाव्या लागतात. तसेच इतर गाड्यांच्या तुलनेत यांना डिझेलची गरजही भासते. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर भार पडत आहे.
या मार्गावर सुरू आहे शिवशाही
सातारा - मुंबई
सातारा - बोरिवली
चौकट
११ - जिल्ह्यातील एकूण आगार
२१ - सातारा आगारात सुरू असलेल्या शिवशाही
२३ - सातारा आगारातील एकूण शिवशाही
चौकट
बसेसचे रोजचे सॅनिटायझेशन
सातारा विभागातील सर्वच आगारांत येणाऱ्या गाड्यांची कोरोनानंतर विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी प्रवास करुन आगारात आलेल्या गाड्या पाण्याने स्वच्छ धुतल्या जातात.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सॅनिटायझरने गाड्या, प्रवाशांचा स्पर्श होईल असे दरवाजे, हॅण्डल, बाकडे, खिडक्या पुसून घेतल्या जात होत्या. त्यानंतरच गाड्या बाहेर सोडल्या जात होत्या.
आता तर सर्वच गाड्यांना ‘ॲन्टी व्हायरस रसायनाचा वापर करुन विशिष्ट असे कोटिंग करण्यात आले आहे. यामुळे एस. टी.च्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू जिवंत राहण्याची शक्यताच नाही.
कोट
मुंबई मार्गावर चांगला प्रतिसाद
सातारा आगारातून सर्वच मार्गांवरील एस. टी.च्या फेऱ्यांना प्रवासी वाढत आहेत. त्यातूनही मुंबई, बोरिवली येथे शिवशाही गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांना प्रवाशांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- रेश्मा गाडेकर
आगार व्यवस्थापक, सातारा.