शिवसेनेचे कौतुक; भाजपच्या मंत्र्यांवर टीका
By Admin | Updated: April 11, 2016 00:38 IST2016-04-10T22:33:07+5:302016-04-11T00:38:06+5:30
शशिकांत शिंदे : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फटकेबाजी

शिवसेनेचे कौतुक; भाजपच्या मंत्र्यांवर टीका
कोरेगाव : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सरकारची कोंडी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांवर एकाबाजूला जोरदार टीका केली तर शिवसेनेच्या मंत्र्यांचे कौतुक केले. विविध मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी सरकारचे वाभाडेच काढले.
भाजपने हाती घेतलेल्या ‘मेक इन इंडिया’चा अत्यंत खरपूस भाषेत समाचार घेत शिवसेनेकडे उद्योग खाते असताना आणि ज्येष्ठ सदस्य सुभाष देसाई त्या खात्याचे मंत्री असताना त्यांना या कार्यक्रमापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याची टीका आ. शिंदे यांनी केली. नेमके शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलावले जाते आणि व्यासपीठाला आग कशी लागते, यावर आ. शिंदे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. आज पुणे-मुंबई-ठाणे येथील औद्योगिक वसाहती ओव्हर फ्लो झाल्या आहेत, मुख्यमंत्र्यांसह भाजपला उद्योग विदर्भात न्यायचे आहेत, त्यासाठी सेव्हन स्टार औद्योगिक वसाहती उभारल्या जात आहेत; मात्र उद्योजकांना विदर्भात जायचे नाही, अशी परिस्थिती असताना राज्य अग्रेसर कसे होईल, असा सवालही त्यांनी केला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पुसेगाव येथे तीर्थक्षेत्र असून, सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. येथे ‘कार्गो हब’ होऊ शकतो, पाण्यासह सर्व व्यवस्था असल्याने ‘कार्गो हब’साठी तब्बल तीनवेळा बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. ‘मेक इन इंडिया’ जरूर करा; मात्र त्यातील योजना फसवी ठरू नये,’ असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
केवळ स्वार्थ साधू नये...
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना केवळ करू.. केवळ करू.. च्या घोषणा सरकार करत आहे, प्रत्यक्षात मात्र काहीच होताना दिसत नाही, असा आरोप केला. दीड वर्षापासून राज्यात युती सरकार आहे; मात्र दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. श्रेयवाद घेण्यासाठी दोन्ही पक्षांची स्पर्धा आहे, स्पर्धा जरूर असावी; मात्र ती जनतेसाठी असावी. त्यातून केवळ स्वार्थ साधला जाऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी नोंदविले