‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला!
By Admin | Updated: June 10, 2014 02:14 IST2014-06-10T01:38:02+5:302014-06-10T02:14:33+5:30
बोटी बंद : पर्यटकांचा ओघ रोडावला; हॉटेल व्यवसाय ठप्प; डोंगराळ भागातील ग्रामस्थांना करावी लागतेय कोरड्या पात्रातून पायपीट

‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला!
सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा भेगाळलेला तळ तब्बल २१ वर्षांनंतर दिसू लागला आहे. पाण्याची पातळी १९९३ नंतर प्रथमच इतकी खालावली असून, त्यामुळे बामणोली-तापोळा भागातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बोटी बंद झाल्यामुळे परिसरातील तीन नद्यांच्या खोऱ्यांत वसलेल्या अनेक दुर्गम गावांमधील ग्रामस्थांना शिवसागराच्या आटलेल्या पात्रातून मोठी पायपीट करावी लागत आहे.
जलाशयातील पाणी खूपच कमी झाल्यामुळे बामणोली आणि तापोळा या ठिकाणचे तीनही बोट क्लब बंद आहेत. बामणोलीत ‘भैरवनाथ’, तर तापोळ्यात ‘विशाल’ आणि ‘शिवसागर’ असे दोन बोट क्लब आहेत. जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना ये-जा करण्याचे होड्या आणि लाँचेस हे एकमेव साधन आहे. काही नौका जिल्हा परिषदेनेही पुरविल्या आहेत. तथापि, त्यातील एकही आता पाण्यात दिसत नाही. सर्व नौका किनाऱ्यावर आणून ठेवण्यात आल्या आहेत.
या विभागात तीन खोरी आहेत. सोळशी आणि कोयनेचा संगम तापोळ्याजवळ होतो, तर कोयना आणि कांदाटी नद्यांचा संगम शेंबडीजवळ होतो. या संगमांपर्यंत पाणी आटले असल्याने त्यापलीकडे असणाऱ्या गावांचा जलमार्ग बंद झाला आहे. यापैकी एका खोऱ्यात दरे, गाडवली, पिंपरी, अकल्पे, निवळी, लामज, वाघावळे, उचाट, कांदाट, काळोशी, म्हाळुंगे, चकदेव आदी दुर्गम गावे आहेत. बामणोलीपासून पुढे एका खोऱ्यात वाळणे, अहीर, पाली, खरोशी, रेणोशी आदी गावे आहेत. तिसऱ्या खोऱ्यात शिंदी, रवदी, अरव, कुसापूर, शेलटी, खिरखंडी अशी गावे आहेत. यातील काही गावांना जोडणारे मार्ग अनुक्रमे बामणोली आणि महाबळेश्वर येथून आहेत; मात्र ते खूपच लांबचे मार्ग आहेत. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थ सध्या शिवसागर जलाशयातून चालत ये-जा करीत आहेत. जलाशयातील कोरडा भाग शोधून चालावे लागत असल्याने खूप लांबचा वळसा ग्रामस्थांना घालावा लागत आहे.
तापोळ्यापासून पुढे वानवडी, सौंदरी, वाघेरा ही गावे आहेत, तर बामणोलीच्या पुढे म्हावशी, तेटली, केळघर, सोळशी, आपटी, निपाणी, कुस, रामेघर, वाकी, लाखवड, गोगवे आदी गावे आहेत. जलाशयात पाणी असताना या गावांना नौकेतून जाता येते. आता जलाशय आटल्याने पात्रातील कोरडा भाग शोधून चालत जावे लागत आहे. काही वेळा वळिवाच्या सरी कोसळतात आणि काही ठिकाणी तात्पुरते पाणी साचते. अशा वेळी काही गावांचा संपर्क दोन ते चार दिवसांसाठी तुटतो.
दरम्यान, धरणात बुडालेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष उघड दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी)