श्रीराम कारखान्यावर शिवसेनेचा मोर्चा
By Admin | Updated: August 18, 2015 00:43 IST2015-08-18T00:43:35+5:302015-08-18T00:43:35+5:30
उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्याची मागणी

श्रीराम कारखान्यावर शिवसेनेचा मोर्चा
फलटण : उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी फलटण येथे शिवसेनेच्या वतीने श्रीराम कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून हा मोर्चा श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गेटपर्यंत काढण्यात आला.
या मोर्चात शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराव जगताप, रासपचे जिल्हाध्यक्ष पै. बजरंग गावडे, रासप खंडाळा तालुका प्रमुख चंद्रकांत शेळके-पाटील, जगन्नाथ यजगर, राहुल देशमुख, पिंटू जगताप, एकनाथ धुमाळ, प्रकाश भोसले, फलटण शहरप्रमुख विजय मायने, काका खराडे, तालुकाप्रमुख विकास राऊत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शंभूराज खलाटे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वालीच कोण राहिला नाही. शेतकऱ्यांनाच झुंजावे लागत आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांसाठी व योग्य दरासाठी निर्णायक भूमिका घ्यावी.
बळीराजाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसास एफआरपीप्रमाणे दर मिळावा, ही आमची मागणी असून, जर कारखान्याने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन केले जाईल.’
‘कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक असल्याने आम्ही रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत कर्जे घेणार असून, लवकरच एफआरपीप्रमाणे दर दिला जाईल,’ असे आश्वासन अध्यक्ष बाळासो शेंडे यांनी दिले. (प्रतिनिधी)