शेडला प्लास्टिकचा कागद लावून अंत्यसंस्कार
By Admin | Updated: August 12, 2014 23:15 IST2014-08-12T22:39:04+5:302014-08-12T23:15:39+5:30
महाबळेश्वर : अंत्यविधीसाठी दीड किलोमीटरची पायपीट

शेडला प्लास्टिकचा कागद लावून अंत्यसंस्कार
अजित जाधव - महाबळेश्वर पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमधील स्मशानभूमीची असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर बांधलेल्या स्मशानभूमीमुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनंत अडचणींना सामोर जावे लागते.
महाबळेश्वर शहर १९२७ मध्ये वसले. तेव्हा सोयीसाठी स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र, वेण्णा नदीवर धरण बांधल्यानंतर हे शेड पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ लागले. त्यानंतर नदीपासून थोड्या अंतरावर नव्याने पत्र्याचे शेड उभारण्यात आले. सध्या याठिकाणीच अंत्यविधी होत आहेत. शहरापासून हे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे. रस्ता कच्चा आणि काट्याकुट्याचा असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची परवड होते. अंतर जास्त असल्यामुळे पार्थिव नेताना कसरत होते.
पावसाळ्यात या शेडमध्ये अंत्यसंस्कार करताना शेडच्या एका बाजूला प्लास्टिकचा कागद लावावा लागतो. सर्वांत श्रीमंत पालिका म्हणून महाबळेश्वरची ओळख असताना पालिका शासन आणि प्रशासनाचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.