अवकाळी पावसाने शाळू भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:22+5:302021-01-08T06:04:22+5:30
गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री ...

अवकाळी पावसाने शाळू भुईसपाट
गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री अवकाळी पावसाने परिसरातील शामगाव, अंतवडी, रिसवड, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांना झोडपल्याने शाळू पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे. शामगावच्या शिवारातील सुमारे पन्नास टक्के पीक भुईसपाट झाले आहे. तर अंतवडी, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांमध्येही नुकसान झाले आहे.
परिसरात यावर्षी पेरणी लवकर झाली होती. तसेच पोषक वातावरणामुळे पिकांची वाढ जोमाने झाली होती. चांगले उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. शामगाव येथील राजेंद्र धर्मा पोळ यांचे सर्व पीक जमीनदोस्त झाले आहे.
- चौकट
माळरानाच्या पिकांसाठी पाऊस पोषक
हा अवकाळी पाऊस माळरानावरील पिकांसाठी वरदान ठरला आहे. माळरानावरील पाणी नसलेले शाळू आता या पावसामुळे जोमाने वाढणार आहेत. परिणामी, माळरानावरील शेतकरी समाधानी आहेत. विभागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
फोटो : ०५केआरडी०५
कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथे अवकाळी पावसाने शाळू पीक भुईसपाट झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. (छाया : बाळकृष्ण शिंदे)