‘शान’च्या आर्त सुरानंतर बरसले ‘काळे मेघ’...

By Admin | Updated: June 3, 2016 00:44 IST2016-06-03T00:43:06+5:302016-06-03T00:44:07+5:30

सर्कलवाडी : काले मेघा.. काले मेघा.. पानी तो बरसाओ; श्रमदानात गायकाचा आलाप...

'Shaan' after 'Art of the Year' Kale Megh ... | ‘शान’च्या आर्त सुरानंतर बरसले ‘काळे मेघ’...

‘शान’च्या आर्त सुरानंतर बरसले ‘काळे मेघ’...

वाठार स्टेशन : ‘काले मेघा... काले मेघा... पाणी तो बरसाओ..!’ हे अभिनेता अमीर खान यांच्या लगान या चित्रपटात ज्यांनी हे गीत गायलं, तेच गायक शान यांनी आज पुन्हा हे गीत कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावच्या रोहिडा, सोळकी डोंगरकपारीत पाण्यासाठी श्रमदान करणाऱ्या शेकडो लोकांसाठी गायलं. या गीताने मात्र उपस्थितांची मने हेलावून गेली. विशेष म्हणजे या परिसरात संध्याकाळी काळे मेघ चक्क बरसले.
अभिनेता अमीर खान याच्या प्रयत्नातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुमारे ८०० लोक श्रमदानाच्या निमित्ताने डोंगर तळाशी सलग समतल स्तर खुदाईसाठी एकत्र जमले होते. लहान मुलांपासून आबालवृद्धही यामध्ये होते. तसेच शासनाच्या महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पार्श्वगायक शान, स्तंभलेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक, रिना दत्ता, लेखक निरंजन अय्यंगार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, नायब तहसीलदार रवींद्र रांजणे, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, कृषी मंडलाधिकारी मोहन गायकवाड, सरपंच रेश्मा काटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्तंभलेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक म्हणाले, ‘६० वर्षांपूर्वी विनोबा भावे इंदोरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वोदयच्या माध्यमातून अशी कामे सुरू केली होती. मात्र त्यानंतर आपला देश राजकारण्यांच्या हाती गेला. राजकारणी लोक अशा कुठल्याही श्रमदानाचा पुरस्कार करत नाहीत. ते त्यांना हवे असलेले काम नोकरशाहीकडून करून घेतात. नोकरशाहीकडून परिवर्तन आणि विकास करून घेता येतो असे राजकारण्यांना वाटते. मात्र श्रमदानही देशाला विकासाच्या मार्गावर नेणारी एक चावी आहे. जो ही फिरवेल तो या देशाचा नेता होऊ शकेल. आज पंतप्रधान, खासदार, आमदार होणे ही फार अवघड बाब राहिली नाही. मात्र जननायक होणं आज अवघड आहे. श्रमदान ही खूप मोठी शक्ती आहे; पण आज श्रमदानाला किंमत दिली जात नाही. श्रमदान करणाऱ्या व्यक्तीला अडाणी समजले जाते हीच खरी खंत आहे.’
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘सर्कलवाडी ग्रामस्थांच्या एकीतून, श्रमातून झालेलं हे काम भविष्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार आहे.
हे सातत्य कायम ठेवा. गावतील उर्वरित कामेही यापुढे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पूर्ण केली जातील.’ (वार्ताहर)


बाशिंग मुंडावळ्यासह दाम्पत्य श्रमदानाला...
सर्कलवाडी हे सुमारे १४०० लोकसंख्येचं गाव आहे. गेल्या ५० दिवसांपासून या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेत वॉटर कप स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. आज या गावातील जवळपास ८०० लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला होता. गावातील महेंद्र साळुंके यांचा नुकताच विवाह झाला होता. गावातील सर्वच लोक पाण्यासाठी यज्ञ करत असताना या दाम्पत्यालाही श्रमदानाचा मोह आवरला नाही. या नवविवाहीत दाम्पत्याने या ठिकाणी श्रमदानाचा हक्क बजावला. यावेळी शान यांनी या दाम्पत्यासाठी गाणं गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.


श्रमदानासाठी तुतारी, डॉल्बी
गावापासून दोन मैल अंतरावर रोहिडा आणि सोळकी या डोंगरपायथ्याला साराच गाव जमला होता. सकाळच्या या वातावरणात काम करणाऱ्या युवकांसाठी खास डॉल्बीची धून तर वयोवृद्धांसाठी शिंगाडी, तुतारी वाजवत घोषणा देत लोक काम करत होते.

सर्कलवाडी गावात ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा होईल एवढं काम गावातील लोकांच्या श्रमदानातून झालं आहे. राहिलेल्या तीन दिवसांत १२५ टीसीएमचे उद्दिष्ट ही पूर्ण होईल. श्रमदानाचा हा जागर महिन्यापासून सुरू आहे. यासाठी ८० लोकांचा एक गट याप्रमाणे आम्ही ८ गट केले आहेत. त्यामुळे हे काम शक्य झाले आहे.
- रेश्मा सरकाळे, सरपंच

Web Title: 'Shaan' after 'Art of the Year' Kale Megh ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.