फलटण अन् कोरेगावच्या नेत्यांना गडचिरोलीला पाठवू
By Admin | Updated: June 13, 2016 00:19 IST2016-06-12T22:17:40+5:302016-06-13T00:19:38+5:30
जयकुमार गोरे : रामराजेंवर टीकास्त्र; शशिकांत शिंदेंना कुणी विचारत नसल्याचा टोला

फलटण अन् कोरेगावच्या नेत्यांना गडचिरोलीला पाठवू
खटाव : ‘प्राध्यापक फलटणकरांना सैराट या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? सैराट म्हणजे बेभान आणि मी जनतेच्या कामांसाठी सुरुवातीपासूनच बेभान आहे. मात्र, बारामतीला मुजरा घालणाऱ्या, स्वत:चा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना जनतेचे देणे-घेणे नाही. कोरेगावकरांना तर आता कुणी विचारत नाही. त्यामुळे त्यांचे तोंड चालायला लागले आहे. माण-खटावच्या नादाला लागल्यावर थेट गडचिरोलीला जावे लागते,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांना नाव घेता लगावला.
निमसोड, ता. खटाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अजित देशमुख, माजी सभापती अशोक गोडसे, ज्येष्ठ नेते धोंडिबापू मोरे, प्रदीप जाधव, काकासाहेब मोरे, डॉ. महेश गुरव, सोमनाथ भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, अॅड. सूरज पाटील, तुकाराम देवकर, शंकर माळी, सोमनाथ बुधे, मोहन देशमुख, सचिन फडतरे, चंद्रकांत देशमुख, सुखदेव फडतरे, नीलेश करपे, विजय मोरे, राजेश निकम, तानाजी देशमुख आदी उपस्थित होते.
रामराजे आणि शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना आमदार गोरे म्हणाले, ‘फलटणकर राजे पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावमध्ये पाणी येणार नाही, असे सांगायचे. त्यांनी कधी त्यासाठी प्रयत्न केलेच नाहीत. त्या माणसांनी नेहमी खोडा घालायचे काम केले. त्यांनी प्रयत्न केले असते तर २० वर्षांपूर्वीच आपल्याकडे पाणी आले असते. आपल्या भागाचा कायापालट झाला असता. या भागाला पाण्यापासून वंचित ठेवणारे फलटकर मला बघून घेण्याची भाषा करीत आहेत. माझ्याकडे खरे तर त्यांनी एकदा बघावेच.
कोरेगावकरांना कोणी विचारत नाही म्हणून परवा त्यांनी तोंड उघडले. मी आमदार झाल्यापासून माण-खटावकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. बारामती, फलटणला मुजरे घालणाऱ्यांनी जरा जपून बोलावे असे सांगून आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘निमसोडच्या विकासात कधीच कमी पडलो नाही. इथले दोन्ही नेते निक्रिय आहेत. त्यांना ज्या जनतेने मोठे केले. त्या जनतेचाच त्यांनी विश्वासघात केला. काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या गाडीत बसून त्यांची पायताणे उचलून गावाचा विकास होत नाही.’ असा टोलाही त्यांनी लगावला. (वार्ताहर)
विरोधकांची बिनचाकाची गाडी...
या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला.
विरोधकांची बिनचाकाची गाडी...
या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला.