घरोघरी वृत्तपत्र विकून माउलीनं लावलंं तिन्ही लेकींचं लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:30 IST2017-09-26T23:30:14+5:302017-09-26T23:30:17+5:30

घरोघरी वृत्तपत्र विकून माउलीनं लावलंं तिन्ही लेकींचं लग्न
अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : पेरले, ता. कºहाड येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या उद्योगातून झालेल्या ओळखीमुळे त्या सध्या पेरले ग्रामपंचायतीचे सदस्य पदही भूषवित आहेत.
दैनिकांचे वृत्त संपादन करणे, संपादित करणे, प्रिंटींग करणे, वितरित करणे या सर्व प्रक्रियांमध्ये अनेकजण गुंतलेले असतात. दिवसरात्र धावपळ करत असतात. या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पेपर घरपोच करणे. पेपर घरपोच करणारे बहुतांशी ठिकाणी पुरुषच असतात. पण पेरले येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत. यातून एक-एक पैसा त्यांनी साठवला. आणि त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी पार पाडली आहेच.
जीवन प्रवास हा अनेक चढ-उतारांचा असतो. संकटे येतात-जातात. येणाºया प्रत्येक संकटाला सामोरे गेले की त्यावर मात करता येते, हे प्रभावती राक्षे यांच्या जीवनप्रवासावरून दिसून येते. त्यांना ८ गुंठे जमीन आहे. तीसुद्धा न्यायालयीन वादात अडकल्याने पडून आहे. कष्ट केले तरच चूल पेटणार अशी त्यांची परिस्थिती. अपघातात एक मुलगा गेला. दुसरा मुलगा लग्न करून स्वत:च्या संसारात गुंतलेला आहे. तरीही प्रभावती राक्षे या खचल्या नाहीत. पेपर विक्री करून संसाराचा गाडा पुढे नेला. तिन्ही मुलींची लग्न त्यांनी पार पाडली. पतीच्या अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांनी नातवाला बरोबर घेऊन पेपर विक्री बंद पडू दिली नाही. स्वत: अनेक वेळा पडल्या, त्यांचा हात मोडला. पण त्याच हातात पेपराची पिशवी भरून आजही त्या पेरले गावातील दीडशे घरांत नित्यनेमाने पेपर टाकण्याचे काम करीत आहेत.
प्रभावती राक्षे सांगतात, सकाळी त्या व पती बाळकृष्ण राक्षे हे दोघे पाच वाजता उठतात. बाळकृष्ण हे पेरले येथून मोटारसायकलवरून काशीळ या गावी जातात. तेथील विक्रेत्याकडून पेपर घेऊन परत पेरले गावी येतात. गावातील सर्व पेपर प्रभावती यांच्या ताब्यात देतात. व स्वत: शिरगाव येथे पेपर विक्रीसाठी जातात. पेपर ताब्यात आले की प्रभावती सर्व पेपर पिशवीत भरतात आणि दीडशे घरांत जाऊन प्रत्येकाला पेपर पोहोच करतात. अनेक लोक भाजीपाला देतात. इतर मदतही करतात.
ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी वर्णी
प्रभावती राक्षे पेपर विक्री झाली की काही घरांत धुण्या-भांड्याची कामेही करतात. यानंतर स्वत: पाळलेली म्हैस घेऊन तिला चरण्यासाठी घेऊन जातात. यात त्याचा दिवस जातो. रिकामा वेळ मिळाला तर कोणाच्या घरी जाऊन बसणे, हे त्यांना मान्य नाही. याच स्वभावामुळे आणि लोकांमध्ये मिसळून राहिल्यामुळे त्यांना पेरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे करण्यात आले आणि त्या निवडूनही आल्या. शक्य होईल तेवढे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या प्रयत्न करीत आहेत. अशा या आधुनिक नवदुर्गाने आपल्या कष्टामुळे व स्वभावामुळे पेरलेकरांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.