हुतात्म्यांच्या भूमित स्वयंशिस्त, मात्र इतरांचा नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:34+5:302021-04-25T04:38:34+5:30
वडूज : वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी वडूज शहर बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला. यामध्ये शासकीय कार्यालये, मेडिकल व ...

हुतात्म्यांच्या भूमित स्वयंशिस्त, मात्र इतरांचा नाहक त्रास
वडूज : वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी वडूज शहर बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला. यामध्ये शासकीय कार्यालये, मेडिकल व रुग्णालये वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. ‘जनता कर्फ्यू’ला वडूजकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हुतात्म्यांच्या भूमित स्वयंशिस्त असताना मात्र जनता कर्फ्यूच्या दुसर्यादिवशी इतर गावांतील लोकांचा त्रास होत आहे.
वडूज शहरासह परिसरातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कडक निर्बंध घालून शहर पूर्णतः बंद करणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच; हा जनता कर्फ्यू पुकारला. वडूजकरांनीही यास पहिल्यादिवशी दाद देत घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे चौका-चौकातील नेहमीच वर्दळीत असणारे रस्ते सुनसान वाटू लागले. या काळात घरपोच दूध सेवा सुरू होती. शहरातील गल्ली-बोळात मोटारसायकलवरून भाजीपाला विक्री करणारे तुरळक प्रमाणात वावरताना आढळून येत होते. सलग दोन दिवस शासकीय कार्यालयाला सुटी असल्याने आणि अन्य इतर सर्व दुकाने कुलूपबंद राहिली आहेत.
तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजला येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याचा वाढता धोका लक्षात घेऊन, किराणा मालासह भाजीपाला व राष्ट्रीयीकृत बँकांसह पतसंस्थाही पूर्णक्षमतेने बंद ठेवण्यात नगरपंचायत प्रशासनाला सहज शक्य झाले. या काळात कोणी नियमांचे उल्लंघन केले, तर नगरपंचायत प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला जातो.
पोलीस सतर्क राहिल्यामुळे विनाकारण कोणीही रस्त्यावर पहिल्यादिवशी फिरकले नाही; मात्र शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील युवक विनाकारण शहराकडे धाव घेत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौका-चौकात पोलीस शहराकडे येणार्यांची कसून चौकशी करीत आहेत.
नागरिकांच्या हितासाठी आणि या आरोग्य संसर्ग आजारापासून बाधितांची संख्या थांबविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. इतर सर्वच प्रशासनाने 'ब्रेक दि चेन'चा घेतलेला निर्णय साखळी तोडण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल, हे निश्चित आहे.
कोट
दुकाने, बँका, शासकीय कार्यालये सुरू नसताना, ये-जा करणार्या वाहनांवर पोलीस यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.
मालोजीराव देशमुख,
सहायक पोलीस निरीक्षक, वडूज
फोटो :
वडूजमध्ये ‘जनता कर्फ्यू’ असताना विनाकारण फिरणाऱ्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. (छाया : शेखर जाधव)