राज्यस्तरीय पथकाकडून जखिणवाडीचे परीक्षण
By Admin | Updated: October 30, 2015 23:44 IST2015-10-30T21:21:47+5:302015-10-30T23:44:46+5:30
गावात दिवाळी : सडा, रांगोळ्यांनी सजले अंगण; पारंपरिक खेळांचे आकर्षण

राज्यस्तरीय पथकाकडून जखिणवाडीचे परीक्षण
मलकापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जखिणवाडी गावाने पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविल्याने राज्य पातळीवरील स्पर्धेत धडक मारली होती. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी परीक्षण केले. या राज्यस्तरीय कमिटीचे गावात जंगी स्वागत करण्यात आले, तर सडा रांगोळ्यांनी गावाला सजविल्यामुळे गावात दिवाळीच साजरी झाली.
शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुका जिल्हा विभागातील व राज्यस्तरीय पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. जखिणवाडी गावाने शासनाच्या विविध १० पुरस्काराबरोबरच स्वच्छतेचे सातत्य राखत स्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्रता सिध्द केली होती. त्यानुसार राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी जखिणवाडी गावाचे निरीक्षण केले. गावाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे सातत्य पाहून समितीने गावातील एकीचे कौतुक केले. बंदीस्त गटार, सौरग्राम, परसबागा, व्यायामशाळा, सांडपाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटार यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांची पाहणी केली.
या पाहणी पथकात राज्याचे अप्पर सचिव वसंत माने, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरे, उगम ग्रामविकास संस्थेचे सुशांत पाईकराव, गोपुरी आश्रमशाळेचे न्योगी, प्रवीण पुरो, सतीश कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच महेश गुरव, ग्रामसेवक एन. डी. लोहार, तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र पाटील, पी. जी. पाटील यांच्यासह महिला सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महिलांच्या हाती सत्ता देशाला आदर्श
राज्यस्तरीय निरीक्षण पथकाने पहाणी केल्यानंतर येथील मळाईदेवी मंदिरात स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी राज्याचे अप्पर सचिव वसंत माने म्हणाले, ‘सर्वच्या सर्व महिलांना बिनविरोध निवडून देऊन गावाने देशाला आदर्श घालून दिला. हे गाव राज्यातच काय, देशात चमकेल असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.’
‘आदर्श घेतल्यास इतिहास घडेल
जखिणवाडीने स्वच्छता अभियानात सातत्य राखले हे आदर्शवत आहे. पण राज्यात इतर गावांनीही असाच आदर्श घेऊन स्वच्छता राखल्यास इतिहास घडेल. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केल्यास शासनाला अभियानच राबवावे लागणार नाही.’ असे मत राज्याचे अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे यांनी व्यक्त केले.