परळी भागात भात रोपांचा तुटवडा

By Admin | Updated: August 1, 2014 23:19 IST2014-08-01T21:28:19+5:302014-08-01T23:19:12+5:30

तरवे करपले : शेतकरी आणतायत दुसऱ्याकडून रोपे विकत-भात रोपांची होतेय चोराचोरी

Scarcity of rice seed in Parli area | परळी भागात भात रोपांचा तुटवडा

परळी भागात भात रोपांचा तुटवडा

परळी : पावसाने गेल्या महिन्याभर जोरदार हजेरी लावल्याने सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील परळी, ठोसेघर, लावंघर परिसरात पारंपरिक भात लावणीला जोरात सुरुवात झाली असली तरी सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भाताचे तरवे काही प्रमाणात करपले आहेत. तर सध्या रोपांचा तुटवडा पडला असून, रोपे शेतकऱ्यांना विकत आणावी लागत आहेत.गेल्या आठ-दहा दिवसांपासून परळी-ठोसेघर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, येथील ओढ्या, नदी, नाल्यांना चांगले पाणी आले आहे. या ठिकाणी असलेल्या उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.
या परिसरातील ठोसेघर, बोरणे, राजापुरी, परळी, बनघर, कूस, खडगाव, वडगाव, लावंघर, पाटेघर आदी गावांना भात हे प्रमुख पीक आहे. भात लावणीसाठी आवश्यक पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने भात लागणीचा वेग आला आहे.
पश्चिम भागाबरोबर सातारा तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली असून, पाऊस सुरू होताना सुरुवातीलाच जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी भुईमूग, भात, सोयाबीन व कडधान्यांची पेरणी उरकून घेतली; परंतु पावसाने चांगला जोर धरल्याने पेरणीसाठी आवश्यक जमिनीची घात न मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत.
पावसाने जर थोडीफार उघडीप दिली तर उर्वरित शेतकऱ्यांच्या शिल्लक पेरण्या होतील. जर पाऊस असाच राहिला तर पेरण्या खोळंबण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पेरण्या न झाल्यास खरेदी केलेली खते बी-बियाणे शेतकऱ्यांकडे पडून राहिल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. पाऊस उशिरा सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक न घेता जुन्या पद्धतीप्रमाणे गौरी शाळू पेरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पाऊस उशिरा आला तरी बळीराजाच अडचणीत आणि पाऊस आला तरीही बळीराजाच अडचणीत ही परिस्थिती कधी बदलणार का बदलणारच नाही, अशा संभ्रमावस्थेत येथील शेतकरी दिसून येत आहेत. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी शासन स्तरावरील शेतकरी पूरक योजनांची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज आहे. शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


पावसाने उशिरा सुरुवात केल्याने अनेक भात रोपे करपली. सध्या भातलागण चालू झाली आहे. शेतकऱ्यांना भात रोपे कमी पडू लागली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन ज्यांच्या शेतामध्ये भात रोपे काढून ठेवली आहेत. ती चोरी करत आहेत. रात्री १२ च्यानंतर सर्वत्र शांत झाल्यानंतरच चोरटे घराबाहेर पडत आहेत.

पावसाने उशिरा सुरुवात केली. लोकांनी पाऊस लवकर येईल, म्हणून पेरण्या केल्या; परंतु पाऊस उशिरा आला तोपर्यंत तरवे जळून गेले आणि सध्या भातरोपांची कमी जाणवू लागली असल्याने शेतकरी ज्यांच्याकडे जास्त रोप आहे. त्यांच्याकडून विकत आणत आहेत.
- किसन कीर्दत, शेतकरी, बनघर

Web Title: Scarcity of rice seed in Parli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.