बचत गटाने शोधला प्रकाशाचा मार्ग...!
By Admin | Updated: November 8, 2015 23:39 IST2015-11-08T22:48:37+5:302015-11-08T23:39:25+5:30
आकाशकंदिलाची निर्मिती : आनेवाडीत वंचित महिलांचा उपक्रम

बचत गटाने शोधला प्रकाशाचा मार्ग...!
नीलेश भोसले -- सायगाव--आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा सर्व मार्ग खुंटतात. भविष्य अंधकारमय दिसू लागते, तेव्हा त्या अंधारावर मात करून स्वत:च्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी उद्याच्या सूर्याची वाट न बघता स्वत: प्रकाशाचा मार्ग शोधण्यासाठी आनेवाडी येथील साई महिला बचत गटाने आकाशकंदील निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या अभिनव उद्योगाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आनेवाडी येथे एकूण दहा महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून साई महिला बचत गट हा वडार समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन वर्षभरापूर्वी बनवलेला गट आहे. अभियानाच्या दशसूत्रीवर चालणारा हा गट नियमित बैठका व बचत करून महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. काही महिन्यांपूर्वी या गटाने पन्नास हजार रुपये व्यवसाय कर्ज घेऊन हा उद्योग आरंभला आहे.
गटामार्फत आकाशकंदील, पुजेचे पारंपरिक ताट व लाकडी स्टिकरची निर्मिती सुरू केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमास नुकतीच प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी भेट देऊन पाहणी केली असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर या गटातील महिलांनी एनकूळ, ता. खटाव येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या गावी नुकतेच प्रशिक्षण दिले.
या गटास सीआरपी संगीता देशमाने मदत करीत असून सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप झनकर, भोसले व गटविकास अधिकारी गजानन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा गट कार्यरत आहे.
हा बचत गट संपूर्णपणे वंचित समाजातील महिलांचा असून कच्चा माल आणण्यापासून ते तयार उत्पादनाची विक्री करण्याचे संपूर्ण काम या महिलाच पाहतात. आकाशकंदील, पूजा ताट, लाकडी स्टीकर अशा वैविध्यपूर्ण उत्पादनामुळे या गटाच्या हस्तकौशल्यास प्रचंड मागणी आहे. विविध ठिकाणाहून लोक ही उत्पादने पाहण्यास येत आहेत.
मी एकूण दहा बचतगट चालवते. हे सर्व गरीब व गरजू महिलांचे गट आहेत. त्यांच्या नियमित बैठका व बचत होते. त्यांना दशसूत्री प्रशिक्षण देण्यात आले असून त्या सर्व व्यवहार सांभाळण्याबरोबरच आता घर सांभाळण्यासाठीही उत्पादनाच्या मार्गातून पुढे आल्या आहेत. हे निश्चितच आशादायी आहे.
- संगीता देशमाने, सीआरपी, आनेवाडी