घरात पाणी वाचवा.. रस्त्यावर मात्र उधळा !
By Admin | Updated: April 26, 2016 00:25 IST2016-04-25T22:58:04+5:302016-04-26T00:25:41+5:30
जलवाहिन्यांची गळती सुरूच : साताऱ्यातील रस्त्यांवर ऐन उन्हाळ्यातही लाखो लिटर पाण्याचा पाट; खुदाईमुळे चांगल्या रस्त्यांना अवकळा

घरात पाणी वाचवा.. रस्त्यावर मात्र उधळा !
सातारा : जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पूर्वेकडच्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव भागांसह पश्चिम भागातही पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले. जिल्ह्यात एका बाजूला असे विदारक चित्र असताना सातारा शहरात मात्र, अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही केल्या गळती थांबत नसल्याचे या गळत्यांच करायचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
लष्कर पाणीपुरवठा केंद्र, सातारा अंतर्गत विसावा जलशुद्धीकरण केंद्र येथे लागलेल्या गळतीचे काम शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे शहर आणि परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात ठेवण्यात आला.
शनिवारी केबीपी कॉलेज, सदर बझार येथे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. सदर बझारमध्ये पाणीपुरवठा बंद न केल्यामुळे पाईपलाईन फुटल्याने अर्धा तास हजारो लिटर पाणी
रस्त्यावर वाया गेले. या ठिकाणी
असे प्रकार दररोज घडत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे.
जीवन प्राधिकरणच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम
हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे हे
काम अधिकच किचकट होऊन
बसले आहे. अनेकदा गळती काढूनही पुन्हा गळती लागत असल्याने प्राधिकरणसह नागरिकांना याचा
मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सातारा शहरात गळती काढण्यासाठी रस्त्यात खुदाई केली जात आहे. खुदाई केल्यानंतर त्या जागी पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
रस्त्याचा जीव घेऊन कनेक्शन सुरू !
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी सातारा शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून आणला. मात्र, त्यांच्याच नावाने शहरात राजकारण करणाऱ्या मंडळींना त्याचे सोयरसुतक राहिले नसल्याचे चित्र आहे. शहरामध्ये नव्याने रस्ते तयार करण्यात आले तेव्हा एकही नवीन कनेक्शन न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पालिका पदाधिकारी सांगत होते; पण याच निर्णयाचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. कारण शहरामध्ये नवीन रस्ते खोदून नळकनेक्शन देण्याचा सपाटा सुरू आहे. नगरसेवकांच्याच आशीर्वादाने ही कनेक्शन्स दिली जात असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
सुधारित पाणी योजना की वानराचे शेपूट
शहरामध्ये गेल्या चार वर्षांपासून सुधारित पाणी योजनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाची मुदतही संपून गेली आहे. रस्ते खुदाई, अपुरा पाणीपुरवठा अशा समस्यांना रोजच्या रोज सामोरे जात सातारकर कंटाळून जात आहेत. ही सुधारित पाणी योजना आहे की वानराचे वाढत जाणारे शेपूट, असा संताप सातारकर व्यक्त करीत आहे.