महाविकास आघाडीतील सर्वांचाच ‘सवता सुभा’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:28+5:302021-01-08T06:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील ...

'Savata Subha' to all in Mahavikas Aghadi! | महाविकास आघाडीतील सर्वांचाच ‘सवता सुभा’ !

महाविकास आघाडीतील सर्वांचाच ‘सवता सुभा’ !

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सवता सुभा मांडला आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी हे सर्वजण एकमेकांच्याच विरोधात लढणार आहेत तर भाजपही तयारीत आहे. या निवडणुकीची चुरस जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांत आहे.

जिल्ह्यात १४९० हून अधिक ग्रामपंचायती आहेत. त्यामधील डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ८७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास ६० टक्के ग्रामपंचायतींची निवडणूक एकाचवेळी होत असल्याने सर्वच पक्ष ताकदीनिशी उतरलेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. अनेक संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असलेतरी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे आघाडीतील एकीचे वारेच वाहिले नाहीत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींपैकी १२३ ठिकाणची निवडणूक पूर्णत: बिनविरोध आहे तर ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक अंशत: बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे ६५४ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर काही ठिकाणी तिरंगी सामना रंगत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बहुतांशी ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. अपवादात्मक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे. शिवसेनाही स्थानिक गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय तर भाजपही अनेक ठिकाणी अस्तित्व दाखवत आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे.

पाटण तालुक्यात नेहमीप्रमाणे पाटणकर विरोधात देसाई गटातच राजकीय द्वंद्व आहे. दोन्ही गटांत नेहमीच काँटे की टक्कर होते. आताही ही निवडणूक चुरशीची होईल तर काँग्रेस आणि भाजपही कमी ठिकाणी रिंगणात आहे. माण तालुक्यात ९० टक्के ठिकाणी दुरंगीच सामना होईल. स्थानिक पातळीवरील गटात ही निवडणूक होत आहे. तालुक्यात महाविकास आघाडीचे वारे नाही. कोरेगाव तालुक्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप रिंगणात आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समोरासमोर सामना आहे.

खंडाळा तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्ष एकत्र आले आहेत. भाजप आणि शिवसेनाही मैदानात आहे. तालुक्यात महाविकास आघाडी नाही. फलटणमध्ये राजे विरोधात खासदार गट अशीच निवडणूक होत आहे. पण, राजे गटाची ताकद अधिक आहे. खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत आहे. तर मोठ्या काही गावांच्या ठिकाणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी अशी लढत आहे. भाजप आणि शिवसेनाही काही ठिकाणी गटातून निवडणूक लढवत आहे.

सातारा तालुक्यात राजे गटाचीच चलती राहणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक सातारा तालुक्यातच होत आहे. कऱ्हाड तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच अधिक करून सामना आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. जावळी तालुक्यात काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली असलीतरी अटीतटीचा सामना आहे. महाबळेश्वरमध्येही दुरंगी लढत होत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र

निवडणूक लागलेली ग्रामपंचायत संख्या - ८७८

पूर्णता बनिविरोध झालेल्या ग्रामपंचायती - १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या - ९८

ग्रामपंचायतींसाठी निवडून जाणारे सदस्य - ७२६६

बिनविरोध निवडून आलेली सदस्यसंख्या - २६३१

प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत संख्या तालुकानिहाय...

सातारा तालुका ९०, कऱ्हाड ८७, पाटण ७२, कोरेगाव ४९, वाई ५७, खंडाळा ५०, महाबळेश्वर १२, फलटण तालुका ७४, जावळी ३७, माण ४७ आणि खटाव तालुका ७७.

.............................................................

Web Title: 'Savata Subha' to all in Mahavikas Aghadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.