महायुतीच्या पेचात साताऱ्याच्या जागा
By Admin | Updated: September 17, 2014 22:23 IST2014-09-17T22:17:56+5:302014-09-17T22:23:25+5:30
तिढा कसा सुटणार : मुंबईच्या निर्णयाकडे स्थानिक कार्यकर्त्यांच्या नजरा

महायुतीच्या पेचात साताऱ्याच्या जागा
सातारा : शिवसेना-भाजपच्या जागावाटपात ७८ जागांचा जो पेच निर्माण झाला आहे, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव आणि सातारा विधानसभा मतदारसंघ कोणाला द्यायचे, याची चर्चा अजूनही काही केल्या संपायला तयार नाही.
भाजपच्या वाट्याला गतविधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण, सातारा आणि माण हे तीन विधानसभा मतदारसंघ होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघ मागितले आहेत. यामध्ये
कोरेगाव आणि वाई या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. जागांची अदलाबदल झाली तर फलटण आणि माण वगळता जिल्ह्यातील महायुतीचे चित्र कसे राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा आहेत. माजी आमदार मदन भोसले जर भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर ‘वाई’ भाजपला सोडला जाणार आहे. परिणामी येथून शिवसेनेत आलेल्या डी. एम. बावळेकर यांची मोठी गोची होणार आहे. कोरेगावातून शिवसेनेचे हणमंत चवरे, दिनेश बर्गे यांची नावे चर्चेत असली तरी भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. /पान ३ वर
जागा सेनेकडे आणि उमेदवार स्वाभिमानीचा
‘कऱ्हाड दक्षिण’ अथवा ‘कऱ्हाड उत्तर’ यापैकी एक जागा शिवसंग्रामला देण्याची मागणी अध्यक्ष विनायक मेटे यांची आहे. मात्र, या जागेवर सेनेचा प्रबळ दावा आहे. येथून स्वाभिमानीने शड्डू ठोकला आहे. शिवसंग्रामला जागा मिळणार नसल्याचे संकेत आहेत आणि सेनाही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे ‘कऱ्हाड उत्तर’ जरी सेनेला गेली, तरी स्वाभिमानी सांगेल तो उमेदवार असेल, अशी माहिती महायुतीतील घटक पक्षाच्या एका नेत्याने दिली.