सातारकरांना नक्कीच पदकाची भेट देईन !
By Admin | Updated: August 24, 2016 00:33 IST2016-08-23T23:53:46+5:302016-08-24T00:33:17+5:30
ललिता बाबरचा ‘लोकमत’शी संवाद : पुढील ‘टोकियो आॅलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक मिळवून ऋणातून उतराई होईन.

सातारकरांना नक्कीच पदकाची भेट देईन !
सातारा : ‘सातारा एक्स्प्रेस’ म्हणून देशभर नावलौकिक पावलेली ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर सातारकरांच्या प्रेमाने भारावून गेल्याचे सांगते. ‘२०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून सातारकरांना मीही पे्रमाची भेट देईन,’ असे उद्गार तिने ‘लोकमत’शी बोलताना काढले.
‘माझे मोही गाव, माण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षांना पुरी पडण्यासाठी आॅलिम्पिक स्पर्धेत धावले. माझ्यासाठी शंभूमहादेवाकडे साकडे घालणाऱ्या माझ्या आई-वडिलांसह सर्वच सातारकरांचे मी मनापासून ऋणी राहीन,’ अशी भावना ललिताने सुरुवातीला व्यक्त केली. आॅलिम्पिकमधील कामगिरीबाबत तुझे काय मत आहे?, या प्रश्नाला उत्तर देताना ललिता म्हणाली, ‘तब्बल ३२ वर्षांपूर्वी भारताची धावपटू पी. टी. उषा आॅलिम्पिकमध्ये धावली होती, त्यानंतर मला ती संधी मिळाली. त्यामुळे मोठं दडपण होतंच. भारतीय क्रीडाप्रेमींच्या माझ्याकडून अपेक्षाही होत्या. त्या पूर्ण करण्याची मी जिद्द बाळगली होती. मी त्याप्रमाणे सराव केला. माझी कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न मी केला. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले; परंतु मला मेडल मिळाले नाही, याचे दु:ख आहे.’
भारतीय खेळाडूंना काय कमी पडतेय?, या प्रश्नाला उत्तर देताना ललिता म्हणाली, ‘आपल्याकडे स्पर्धाच कमी आहे. आॅलिम्पिकचा सराव करत असताना सुधा सिंग आणि मी असे आम्ही दोघेच स्पर्धात्मक तयारी करत होतो. मात्र, परदेशामध्ये एका स्पर्धेसाठी तब्बल ५० जण कसून सराव करत असतात. या स्पर्धात्मक वातावरणामुळे त्यांची कामगिरी उंचावते. भारतात क्रिकेटला जितके महत्त्व दिले जाते, तितके महत्त्व अॅथलेटिक खेळांनाही दिले पाहिजे, तरच स्पर्धात्मक गुणवत्ता वाढीला लागून नक्कीच आॅलिम्पिकमधल्या पदकांची कमाई जास्त होईल.’
स्पर्धेच्या काळात कुटुंबीयांशी काय बोलणे झाले? या प्रश्नावर बोलताना ललिताने सांगितले की, ‘स्पर्धेच्या आठ दिवस आधी मी कुटुंबीयांशी बोलले. माणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, असं सांगण्यात येत होतं. स्पर्धेच्या आधी आठ दिवस मात्र मी कुटुंबीयांशी कसलाही संवाद ठेवला नाही. मी माझं लक्ष खेळावर केंद्रित केलं होतं.’
३२ वर्षांनंतर आॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावणारी मी पहिली भारतीय धावपटू होते. याचे दडपण होतेच. इतर देशांच्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी निश्चित माहिती नव्हती. विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहेत, असे धावपटू माझे स्पर्धक होते. आता या स्पर्धेचा चांगलाच अंदाज आला असल्याने मी आणखी नियोजनबद्ध पद्धतीने सराव करणार आहे.
- ललिता बाबर
भारतामध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या एशियन गेममध्ये ती गोल्ड मेडल तर घेईलच, ३ हजार मीटर स्टिपलचेस या प्रकारातील सध्याचं रेकॉर्ड ९ मिनिट १९ सेकंद आहे. त्यात आणखी ती नक्की सुधारणा करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
- संजय वाटेगावकर, सचिव,
सातारा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन.