सरपंच ग्रामसभा अर्धवट सोडून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:17+5:302021-09-11T04:40:17+5:30
कोपर्डे हवेली : कोरमअभावी तहकूब झालेली कोपर्डे हवेली येथील ग्रामसभा तणावाच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ...

सरपंच ग्रामसभा अर्धवट सोडून गायब
कोपर्डे हवेली : कोरमअभावी तहकूब झालेली कोपर्डे हवेली येथील ग्रामसभा तणावाच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नेताजी चव्हाण होते. दरम्यान, सरपंच नेताजी चव्हाण हे ग्रामसभा अर्धवट सोडूनच गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, तलाठी दादासाहेब कणसे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, अंजना चव्हाण, डी. एस. काशिद, रघुनाथ खरात, वंदना लोहार, सुनील सरगडे, दादासाहेब चव्हाण, संदीप चव्हाण, शरद चव्हाण, शैलेश चव्हाण, महेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, विवेक चव्हाण, उत्तम चव्हाण, श्रीरंग चव्हाण उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी मागील सभेचा इतिवृत्त वाचून दाखवला. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी ग्रामपंचायतीने सावध राहून तरतूद करावी, अशी सूचना केली. त्याला सहमती देण्यात आली. शिवाजी चव्हाण यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केली. यावेळी कचरा व्यवस्थापन करण्याचे काम सुरू आहे, लवकरच तो प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. पंधरा वित्त आयोगाच्या कामाचे नियोजन, मनरेगाअंतर्गत पुरवणी आराखडा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, वैयक्तिक लाभार्थी आदींचे ठराव घेण्यात आले.
यावेळी तंटामुक्त समितीसह विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. पाणंद रस्त्यांची अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात चर्चा झाली. सरपंच ग्रामसभेतून निघून गेल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सरपंच ग्रामसभा अर्धवट सोडून निघून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. यासंदर्भात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील यांनी सांगितले.
कोट :
ग्रामसभेतून ग्रामस्थांचे प्रश्न अर्धवट सोडून निघून जाणे निंदनीय आहे. विद्यमान सरपंचांचे हे वागणे अशोभनीय असेच आहे. यामुळे गावच्या विकासाला खीळ बसू शकते.
- अमित पाटील, विरोधी गटनेते, कोपर्डे हवेली.
चौकट
अजेंड्यावरील विषय संपल्यावर गेलो
अजेंड्यावरील सर्व विषय संपवूनच मी ग्रामसभेतून महत्त्वाच्या कामानिमित्त निघून गेलो. त्याचा अर्थ विरोधकांची वेगळा काढला. गावच्या विकासासाठी माझी निवड झाली असून, त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही सरपंच नेताजी चव्हाण यांनी दिली.
फोटो १०कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली येथील ग्रामसभेत विषयाचे वाचन शिवाजी लाटे यांनी केले. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, नानासोा चव्हाण, डी. एस. काशिद उपस्थित होते. (छाया : शंकर पोळ)